👁 6 Views

हृदयद्रावक ! १५ मृतदेह अन् सप्तपदी ; आई, बहीण , भाऊ गेल्याचं नवरीला माहितच नाही

 

धनबाद – झारखंडच्या धनबाद येथील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सुबोध श्रीवास्तव यांच्या मुलीचं लग्न होते. परंतु एका ठिणगीनं लागलेल्या आगीत नवरीची आई, बहिण, आजोबा, काकीसह १५ लोकांचा जीव गेला.


तर नवरी स्वाती हिला तिच्या घरात इतकं मोठं संकट कोसळलंय या घटनेची कुठलीही कल्पना नव्हती. नातेवाईकाचा मृत्यू झालाय एवढेच नवरीला सांगण्यात आले होते.


नवरीला फक्त सांगितले होते की, घरात आग लागली आहे आणि आई जखमी झालीय. हे ऐकताच मुलीच्या चेहऱ्यावरील सगळा आनंद झटक्यात उतरला. मंगळवारी रात्री विवाहस्थळी लग्नाच्या विधी पूर्ण करण्यात आल्या. हे सर्व सुरू असताना स्वातीचा चेहरा उदास होता. तिचे डोळे वारंवार आई, भाऊ आणि अन्य नातेवाईकांना शोधत होते. परंतु ती गप्पपणे लग्नाच्या सर्व विधी करत गेली.


धनबादच्या जोडाफाटक शक्ती मंदिर रोडवरील आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजता आग लागली. या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुबोध लाल यांच्या मुलीचं लग्न होते. त्यांच्या घरी हजारीबाग, बोकारो इथून नातेवाईक आले होते. पण दुर्दैवाने आगीच्या दुर्घटनेत १५ लोकांचा जीव गेला.



धनबादचे पोलीस उपायुक्त संदीप कुमार म्हणाले की, आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या पूजेदरम्यान एक छोटी ठिणगी पडली आणि त्याचे आगीत रुपांतर झाले. आग इतकी जास्त पसरली की १५ लोक आगीच्या भक्ष्यस्थानी आले. जेव्हा अपार्टमेंटमध्ये आग लागल्याचं कळालं तेव्हा इमारतीत राहणारे १०० हून अधिक लोक टेरेसकडे धावले. त्यामुळे ते सुरक्षित राहिले. परंतु ज्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला ते सर्व आगीत मृत्यूमुखी पडले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *