गावातील भाजीपाला, दुध पुरवठा शंभर टक्के बंद करण्याचा निर्धार
पंढरपूर : प्रतिनिधी
राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपास वाखरी येथील सर्व शेतकरी बांधवांनी एकमुखाने पाठींबा दर्शवला असून गावातील भाजीपाला, दुध आणि इतर शेत माल राज्य सरकार मागण्या मान्य करेपर्यंत गावाबाहेर द्यायचा नाही असा निर्धार सर्व शेतकर्यांनी केला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी राज्य सरकारचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस याचा प्रतिकात्मक पुतळा करून त्या पुतळ्यास दुधाने अभिषेक घालण्यात आला. तसेच टोमॅटोचा हार गळ्यात अडकावून फुलांचीही उधळण पुतळ्यावर करण्यात आली. शेतकरी एकजुटीचा विजय असो, राज्य सरकारचा निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा देत नंतर पुतळ्यास सर्व उपस्थित शेतकर्यांनी जोडेही मारले.
गुरूवारी सायंकाळी वाखरी ग्रामपंचायतीच्या आवारात गावातील सर्वच राजकीय पक्ष, गट आणि संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, नेते मंडळी तसेच दुध, भाजीपाला उत्पादकांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकर्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपामध्ये वाखरीतील सर्वच शेतकर्यांनी सहभाग घेण्याचा ठराव करण्यात आला.
तसेच जोपर्यंत शेतकर्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत गावातील भाजीपाला, दुध पुरवठा बाहेर करायचा नाही. गावातच भाजीपाला आणि दुध विकायचे किंवा घरीच त्याचे पदार्थ करून वापरायचे असेही यावेळी ठरवण्यात आले.
यावेळी गंगाधार गायकवाड, गुलाबराव पोरे, शिवाजी मदने, इब्राहिम मुजावर, पांडूरंग पिसे, जोतीराम पोरे,अभिमान साळूंखे, सिताराम सुरवसे, रणजित जगताप, सोमनाथ पोरे, लक्ष्मण पोरे, संजय अभंगराव, सदाशिव मस्के, संग्राम गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
——————————————————-
आज वाखरी बंदचे आवाहन
शेतकरी संपात सहभागाच्या दुसर्या दिवशी वाखरी बंदचे आवाहन सर्वच शेतकर्यांच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवार ( दि. 3 जुन ) रोजी गावातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि इतर व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तशा प्रकारचे आवाहन सर्व शेतकर्यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111






