👁 10 Views

वृद्ध, गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार समर्पित : थावरचंद गहलोत

लाभार्थी रामदास यांना व्हीलचेअरचे वितरण करून हस्तांदोलन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून रामदास आठवले, नितीन गडकरी, थावरचंद गहलोत, नंदा जिचकार, डॉ. मिलिंद माने

नागपूर, ४ जून
वृद्धापकाळात नागरिकांच्या आवश्यक गरजा पूर्ण करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून ‘सबका सन्मान, सबका उत्थान’ या धोरणावर सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय कार्यरत आहे. बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील आर्थिकदृष्ट्या कमजोर व गरजू नागरिकांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार वृद्ध, गरीब, कमजोर घटकाच्या कल्याणासाठी समर्पित आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) व जिल्हा प्रशासन नागपूरतर्फे ४ जून रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना साहाय्यकारी उपकरणांच्या वितरण शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, खा. विकास महात्मे, आ. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.
गहलोत म्हणाले, आंध्रप्रदेशातील नेल्लोर येथे प्रथम शिबिर, द्वितीय शिबिर मध्यप्रदेशातील उज्जैन येथे घेण्यात आले. नागपुरातील हे या योजनेतील तिसरे शिबिर आहे. ज्येष्ठ नागरिकांना साहाय्यकारी आत्याधुनिक उपकरणे पुरविण्यासाठी मंत्रालयाने ४८३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून, २६० जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या तीन वर्षात या सरकारने सामाजिक न्याय मंत्रालयाला जिवंत व अधिक सक्रिय केले आहे. ५ हजार ३०० हून अधिक सार्वजनिक वितरण शिबिरातून ७ लाख लाभार्थ्यांना ५०० कोटींची उपकरणे वितरित करण्यात आली आहे. याची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. समाजातील वंचित व शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साकारलेली अंत्योदय संकल्पना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नरत असून, वयोश्री योजना त्याचाच एक भाग आहे. कॉक्लियर इम्प्लाट या कानाच्या महागड्या शस्त्रक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे अत्यंत कमी खर्चात केल्या जातात. याचा लाभ सर्व लहान मुलांना मिळाला पाहिजे. ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह नागपूर येथे उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री गहलोत यांनी मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी शहर व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ६० लाख ४८ हजारांच्या साहाय्यकारी उपकरणांचे वितरण झाले. यात ७३५ वॉकिंग स्टिक, ८ कोहनी छडी, २२ वॉकर, १८ बैसाखी, ८० ट्रायपॉट, २७२ कृत्रिम दात (कवळी), ४४४ चष्मे, २९२ व्हीलचेअर, ५१२ कर्णयंत्रांचा समावेश होता.
ज्येष्ठांसाठी नि:शुल्क इलेक्ट्रिक बस : गडकरी
ज्येष्ठ नागरिकांसाठी इलेक्ट्रिक बसची सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्याची इच्छा मनात होती. त्यासाठी मी प्रदूषणमुक्त अशी अत्याधुनिक बस उपलब्ध केली आहे. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बालकांसाठी शहर व जिल्ह्यातील प्रेक्षणीय व ऐतिहासिक सहलींसाठी ही बस नि:शुल्क उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत कॅन्सर डिटेक्ट मशिनच्या माध्यमातून ४० हजार महिलांचे नि:शुल्क परीक्षण करण्यात आले असून, त्यातील ४७१ महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याचा अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा, यासाठी महापौरांनीही पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचित केले. दिव्यांग व वंचित घटकांची सेवा हे ईश्‍वरीय कार्य असून, त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व बडोले यांनी पुढाकार घ्यावा, आपण केंद्राकडून शक्य ती मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *