👁 10 Views

कर्जमाफी तात्पुरती मलमपट्टीः नाना पाटेकर

मुंबई

जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी शेतकऱ्यांना संपावर जावं लागणं यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. त्यांच्या आंदोलनाला ‘नाम’चा पूर्ण पाठिंबा आहे, अशी भूमिका मांडतानाच, कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव दिल्यास कर्जमाफी मागावीच लागणार नाही, असं स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी आज व्यक्त केलं.

अल्पभूधारक शेतकरी किंवा कोरडवाडू शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांचं कर्ज सरकारनं माफ करावं, पण ज्यांचा शेतीशिवाय अन्य कुठला व्यवसाय आहे, शेती हा ज्यांच्यासाठी जोडधंदा आहे, त्यांना कर्जमाफी देण्याची गरज नाही, असंही नानाने नमूद केलं. सक्षम शेतकऱ्यांनी स्वतःहून कर्जमाफी नाकारायला हवी, असंही त्यांनी सूचित केलं.

गेला आठवडाभर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाचं अस्त्र उगारलं आहे. कर्जमाफी, हमी भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या मागण्यांसाठी अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या संपाबाबत नामची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्देः


मकरंद म्हणाला, 

>> शेतकऱ्यांचा फुटबॉल करू नका. त्यांच्याकडे माणूस म्हणून बघा.
>> शेतकरी संपाला ‘नाम’चा पाठिंबा आहे.
>> कर्जमाफी, हमी भाव आणि स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळेल.
>> शेतकरी संघटित होतोय, ही महत्वाची गोष्ट
>> आम्हाला पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार काही नको. केवळ शेतकऱ्यांचं हित व्हावं एवढीच इच्छा आहे.
>> आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच जलसंधारणाचं काम आम्ही करतोय.
>> सेलिब्रिटी शेतकऱ्यांसाठी पुढे का येत नाहीत? विविध क्षेत्रातील लोकांनी बळीराजासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

नाना पाटेकर म्हणाले,

>> शेतकऱ्यांना मूलभूत गोष्टींसाठी संप करावा लागतोय याचं वाईट वाटतं.
>> जो गळफास घेऊ शकतो, तो प्रसंगी गळफास लावूही शकतो, असं मी मागेच म्हटलं होतं.
>> शेतमालाला हमी भाव दिल्यास कर्जमाफी मागावीच लागणार नाही.
>> कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी.
>> माझीही शेतजमीन आहे. मीही शेती करतो. पण माझा दुसराही व्यवसाय आहे. माझ्यासारख्यांना कर्जमाफीची गरज नाही.
>> हमी भाव नुसता जाहीर करून चालणार नाही. व्यापाऱ्यांना त्या दरानं माल न घेतल्यास सरकारनं तो खरेदी करायला हवा.
>> शेतकरी संघटित झाल्यास केवढी मोठी ताकद उभी राहील. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही.
>> शेतकरी संपामागे जनतेला नाडणं हा विचार नाही. आपल्या मागण्या मांडणं हाच हेतू.
>> आमचा शेतकरी लबाड नाही, तो गांजलाय. मुख्यमंत्री फडणवीस याचा साकल्याने आणि सहानुभूतीने विचार करतील.
>> शेतकरी आपले आणि सरकारही आपलंच.
>> शेतमालाची नासाडी होणं मान्य नाही. तो उद्रेक दाखवण्याचा प्रकार असावा.
>> शेतकरी संपाचं राजकारण होतंय हे नक्की. ते होणारच. ही प्रथा पूर्वापार चालत आलीय.
>> आंदोलन जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल, तितकं ते उफाळून येईल.
>> कलावंतांनी राजकारणात येऊ नये.
>> सगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्र यायला हवं. त्यांची एकच संघटना असावी.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *