दोन्ही पालख्या आज पुण्यात : आगमनासाठी भाविकांनी केली जय्यत तयारी
पुणे – टाळ-मृदुंग आणि विठु-नामाचा गजर करत श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे देहू आणि आळंदी येथून प्रस्थान झाले. रविवारी (दि. 18) दुपारी या दोन्ही पालख्यांचे शहरात आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे पालखी मुक्कामी येणार असल्याने मंदिर परिसरातील तयारी जवळपास झाली आहे. आगमनासाठीही ठिकठिकाणी कमानी लावून स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी असते. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थानच्या मंदिरात मुक्कामी येते. दोन्ही मंदिराच्या बाहेर महापालिकेतर्फे मडप उभारण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीकरिता दरवर्षी दर्शनबारीही उभारण्यात येते. महापालिका परिसराची पाहणी करून तेथे औषधफवारणी केली आहे. तसेच आसपासचा परिसरही स्वच्छ करण्यात आला आहे. या दोन्ही पालख्यांचे स्वागत संगमवाडी येथे केले जाते. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारण्यात आला असून, पुष्पवृष्टीत या दोन्ही पालख्यांचे स्वागत होणार आहे.
शहरात दररोज सायंकाळी वरूणराजा हजेरी लावत आहे. त्यामुळे कोठेही दुर्गंधी पसरू नये, यासाठी औषध फवारणी आणि स्वच्छता ठेवण्याचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच विविध संघटना, पक्ष यांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी भोजनाची, न्याहरीची सोय करण्यात येते. त्यामुळे कार्यकर्तेही कामात व्यस्त आहेत. पालखी स्वागतासाठी रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या जातात. त्यासाठी कलाकारांची गडबड सुरू आहे. ठिकठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
मंदिर प्रशासन सज्ज
वारीनिमित्त भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थानच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यांचे भोजन, न्याहरीची व्यवस्थाही ट्रस्टतर्फे करण्यात येते. मंदिर परिसरात आठ हजार चौरस फुटाचा मांडव घालण्यात आला आहे. अशी माहिती दोन्ही मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे आणि व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी दिली.





