मध्य प्रदेशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना
बैलांचा खर्च परवडत नसल्याने नांगरणीसाठी मुलींचा वापर करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
देशभरातील शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे. हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्यावर पोटच्या मुलींना नांगराला जुंपण्याची वेळ आली आहे. बैल खरेदी करणे आणि त्यांची काळजी घेणे परवडत नसल्याने एका शेतकऱ्याने त्याच्या दोन मुलींनाच नांगराला जुंपले आहे.
मध्य प्रदेशमधील सेहोरच्या बसंतपूर पंगारी गावात राहणाऱ्या सरदार काहला या शेतकऱ्याने त्याच्या दोन मुलींनी नांगराला जुंपले आहे. ‘शेत नांगरण्यासाठी बैल खरेदी करण्याइतकी आणि त्या बैलांचे पोट भरण्याएवढी आर्थिक परिस्थिती नाही. घरातील परिस्थिती अतिशय बिकट असल्याने दोन्ही मुलींना शाळा सोडली आहे. शाळेत जात नसल्याने दोन्ही मुली शेतीच्या कामांमध्ये मदत करतात,’ अशी माहिती सरदार काहला यांनी दिली.
‘या प्रकरणात प्रशासन लक्ष घालत असून संबंधित शेतकऱ्याला सरकारी योजनांतर्गत योग्य मदत देण्यात येईल,’ अशी माहिती जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी आशिष शर्मा यांनी दिली. ‘अशा कामांसाठी मुलांचा वापर केला जाऊ नये, अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांना सरकारी योजनांच्या आधारे मदतीचा हात दिला जाईल. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत,’ असे शर्मा यांनी सांगितले.
सरदार काहला यांना दोन राधिका (वय १४ वर्ष) आणि कुंती (वय ११ वर्ष) या दोन मुली आहेत. राधिका आणि कुंतीने घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शिक्षण सोडले आहे. मध्य प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मंदसौरमध्ये शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले होते. कर्जमाफी आणि हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करत सरकारला इशारा दिला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यूदेखील झाला होता. मध्य प्रदेश सरकारच्या या कारवाईवर जोरदार टीका झाली होती. शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्यानंतर मंदसौरमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111













