15 Jul. 2017
पाचवी, आठवी, दहावी व बारावीची परीक्षा बाहेरुन देता येणार
पुणे – राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या धर्तीवर आता राज्यातही मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना झाली असून इयत्ता पाचवी, आठवी, दहावी व बारावीच्या परीक्षा आता बाहेरुन देणे शक्य झाले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अख्यत्यारितच या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
औपचारिक शिक्षणाला पुरक व समांतर शिक्षण पध्दती सुरु करण्यासाठी व विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर बाहेरुन शिक्षण घेत परीक्षा देण्याची मुभा ही केवळ इयत्ता दहावी व बारावीपर्यंतच मर्यादित होती.
मात्र आता इयत्ता पाचवीपासून विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या मुक्त विद्यालय मंडळातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जा मिळणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात राज्यातील अंदाजे 5 लाख विद्यार्थ्यांची गळती विविध टप्प्यावर होते आहे. यामध्ये मुलींच्या गळतीचे प्रमाण चिंताजनक आहे. राज्य मंडळाने आतापर्यंत इयत्ता दहावी व बारावी बाहेरुन परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी एक ते दीड लाख विद्यार्थी प्रविष्ठ होतात. पाच लाखांपैकी एक ते दीड लाख विद्यार्थीच दहावी व बारावीच्या परीक्षेपर्यंत पोहचात त्यामुळेच अन्य विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच थांबल्याचे समोर येत आहे. कोणत्याही बंधनाशिवाय विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेता यावे तसेच त्याला समांतर शिक्षणाचा दर्जा मिळावा यासाठी शिक्षण विभागाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली आहे.










