सोलापूर दि. 15 :- जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात समृध्दी येत आहे. या अभियानामुळे राज्याचा ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले.
जलयुक्त शिवार अभियानातील राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराचे वितरण आज जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आज झाले. येथील श्री. शिवछत्रपती रंगभवन सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रा. राम शिंदे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार विलास जगताप, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे गावागावातील दुष्काळावर मात करणे शासनाला शक्य झालं आहे. जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग असल्यामुळे हे अभियान केवळ शासनाचे न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. लोकचळवळीमुळे अभियानातील कामासाठी लोकांनी पैसा उभा केला. अनेक गावात निवृत्त झालेल्या लोकांनी निवृत्तीवेतनाचे पैसे दिले. लहान मुलांनी वाढदिवसाला मिळालेले पैसे जयलुक्त शिवारच्या कामासाठी दिले. यावरुन या अभियानाला लोकांनी आपले मानले असल्याचे स्पष्ट होते’.
जलयुक्त शिवार अभियानाला प्रसार माध्यमांनी चांगली प्रसिध्दी दिली. यासाठी प्रसारमाध्यमे आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे मी याठिकाणी आभार मानतो. शासकीय अभियानापासून लोकचळवळीत रुपांतर होण्यात प्रसार माध्यमांचा मोलाचा वाटा आहे. आज येथे ज्या पत्रकारांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचे अभिनंदन करतो. यापुढेही अभियानाच्या कामकाजाबाबत लिखाण करावे, असे आवाहन श्री. राम शिंदे यांनी केले.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार अभियानातील कार्यक्रमामुळे अनेक गावांत चांगली कामे झाली आहेत. गावा गावांतील वाद मिटले आहे. अनेक गावांतील दूध आणि शेतीचे उत्पादन वाढले. अभियान समृध्दीचे दूत ठरले आहे’.
यावेळी विभाग आणि जिल्हा स्तरावर विजेत्या ठरलेल्या जिल्हा, गाव आणि तालुका यांना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारांसाठी असणाऱ्या पुरस्काराने पाचही जिल्ह्यातील विजेत्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी आभार मानले. प्रकल्प संचालक रवींद्र माने यांनी संयोजन केले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




