पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017
औरंगाबाद मंत्रिमंडळ बैठकीनंतर मागील वर्षभरात
मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना गती
मुंबई, दि. २० : औरंगाबाद येथे मागील वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील सिंचन वाढविण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीत निम्न दुधना प्रकल्प तसेच नांदूर मधमेश्वर प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील एका वर्षात या प्रकल्पांवर साधारण ६८६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मराठवाड्यात आधीच्या काळात रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प गतिमान झाले असून उर्वरीत कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून काही निर्णयांवर काम सुरु आहे. उर्वरीत कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी विविध विभागांच्या सचिवांना दिले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
२ सिंचन प्रकल्पांवर ६८६ कोटी रुपये खर्च, १२ वर्षापासून रखडलेले वाकी धरण पूर्ण
१२ वर्षापासून ऱखडलेले वाकी धरणाचे काम औरंगाबाद मंत्रिमंडळ बैठकीनंतर निधी उपलब्ध झाल्याने आता पूर्ण झाले आहे. तसेच भाम धरणाचे कामही मागच्या एका वर्षात ४० टक्क्यांवरुन ८५ टक्के पूर्ण झाले असून ते मार्च २०१८ पर्यंत १०० टक्के पूर्ण होईल. वाकी धरणाच्या पुर्ततेमुळे ७५.८ एमसीएम इतकी पाणीसाठा क्षमता निर्माण झाली असून ८ हजार ९४० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. अनेक वर्षे रखडलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम गतिमान झाले असून त्यातून आतापर्यंत साधारण ५० हजार ३० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. मार्च २०१८ अखेर यातून निर्धारीत ५३ हजार ३४७ हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण करण्यात येईल. या प्रकल्पासाठी मागील एका वर्षात ३५३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. आधीच्या २२ वर्षात या प्रकल्पासाठी १ हजार ४५० कोटी म्हणजे वार्षिक सरासरी ६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. आता मागील एका वर्षात ३५३ कोटी रुपये खर्च झाल्याने प्रकल्पाचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे.
निम्न दुधना प्रकल्पांतर्गत (जि. परभणी) वाकी आणि भाम धरणाचे काम करावयाचे होते. यापैकी वाकी धरणाच्या कामास २००४ मध्ये मान्यता देण्यात आली. ऑक्टोबर २०१६ पर्यंत या धरणाच्या कामावर फक्त ९५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे हे धरण रेंगाळले होते. पण मागील वर्षी ऑक्टोबर २०१६ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धरणाच्या कामास गती देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार अवघ्या एका वर्षात या धरणासाठी ३३२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून या धरणात ७५.८ एमसीएम इतकी पाणीसाठा क्षमता निर्माण झाली असून ८ हजार ९४० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याशिवाय भाम धरणाचे काम मागील वर्षी ४० टक्के पूर्ण होते. औरंगाबाद मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानंतर या धरणाच्या कामासही गती देण्यात येऊन ते सध्या ८५ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०१८ पर्यंत या धरणाचे काम पूर्ण होईल.
कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यास पाणी देण्यासाठीच्या प्रकल्पांना गती
मराठवाडा विभागात सिंचनासाठी कृष्णा खोऱ्यातून पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यक्रम तयार करुन ४ वर्षाच्या कालावधीत त्याला विशेष निधी उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार सन २०१७-१८ मध्ये कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पासह कृष्णा मराठवाडा प्रकल्पास २५० कोटी रुपयांचा विशेष निधी राज्यपालांच्या सुत्राबाहेर मंजूर करण्यात आला आहे. यामुळे २००७ पासून रखडलेल्या या कामास गती प्राप्त झाली आहे. कडकनाथवाडी साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून येसवंडी साठवण तलाव, नळदूर्ग बंधारा आणि सोमनथळी बॅरेजचे काम प्रगतीपथावर आहे. अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. मराठवाड्यातील पाण्याची गरज लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत हे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
मराठवाड्यासाठी मान्य करण्यात आलेल्या सुक्ष्मसिंचन योजनेसाठी २०१६-१७ मध्ये ५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा १९ हजार ५६० शेतकऱ्यांना लाभ झाला. त्यातून साधारण १६ हजार ८१८ हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन निर्माण झाले. चालू वर्षी मराठवाड्यात सुक्ष्मसिंचनासाठी १४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. सुक्ष्मसिंचनावर जास्तीत जास्त भर देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाखाली आणण्यात यावे. या योजनेसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मराठवाडा विभागात १ लाख ७ हजार घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करुन देऊन २०१८ अखेर ही घरकुले पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तेर येथील शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही गतिमान झाली असून याची निविदा प्रसिद्ध करुन बांधकाम तातडीने सुरु करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, जालना रेशीमकोष बाजारपेठ, लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था स्थापन करणे, औरंगाबाद येथील जलसंधारण आयुक्तालय, औरंगाबाद, बीड, जालना,उस्मानाबाद, परभणी येथे नवी कौटुंबिक न्यायालय स्थापन करणे आदी विविध विषयांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासह विविध विभागांचे सचिव डी. के. जैन, सुधीर श्रीवास्तव, आय. एस. चहल, प्रविण परदेशी,सुनिल पोरवाल, मनोज सौनिक, नितीन गद्रे, आशिषकुमार सिंह, असीम गुप्ता, वल्सा नायर सिंह, एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
००००००
वि. 7296 29 कार्तिक, 1939(दु.2.40)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर तर अन्य जिल्ह्यांसाठी १ जानेवारीपर्यंत मुदत
मुंबई, दि. 20 :राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागाची अंतिम मुदत सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी पिकाकरिता दि. 30 नोव्हेंबर आहे. अन्य जिल्ह्यांतील सर्व अधिसुचित पिकांकरिता सहभागाची मुदत दि. 1 जानेवारी2018 आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
शेतकरी बांधवांना या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) येथे विमा अर्ज सादर करता येतील. तरी शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज याठिकाणी जमा करावेत.
त्याचबरोबर योजनेतील सहभागासाठी नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
००००
अजय जाधव..२०.११.१७
वि. 7297 29 कार्तिक, 1939(दु.2.40)
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे
मुंबई, दि. २० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर उद्या मंगळवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका उत्तरा मोने यांनी घेतली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे उभारण्यात येणारे स्मारक, अपंगासाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चिरागनगर घाटकोपर येथे उभारण्यात येणारे स्मारक,मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘स्वाधार’ योजना, सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती श्री. कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
*****
वि. 7299 29 कार्तिक, 1939(सायं.5.45)
वित्त विभागात जेंडर बजेट सेल
प्रभावी अंमलबजावणी आणि नियंत्रणासाठी
आंतरविभागीय समितीची स्थापना
मुंबई, दि. २० : जेंडर बजेटच्या अंमलबजावणीसाठी राज्यात वित्त विभागाच्या अंतर्गत जेंडर बजेट सेलची स्थापना करण्यात येणार आहे. शासनाच्या महिला व बालविकास संबंधीच्या योजना आणि कार्यक्रमाचा निधी योग्यपद्धतीने राखून ठेवणे आणि त्याचा प्रभावी विनियोग करून महिला व बालकांच्या जीवनमानात प्रत्यक्षात बदल घडवून आणणे यासाठी आंतरविभागीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आज सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, युनिसेफ, युएन विमेन, ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रत्येक शासकीय विभागात महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने एका नोडल ऑफीसरची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, महिला व बालकांच्या विकासाच्या योजनांची विविध विभागांकडून अंमलबजावणी केली जाते. यात सांगड घालून त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण कशी होईल याकडे हा सेल लक्ष देईल. योजनांचे मुल्यमापन करतांना कामाचे फलित (आऊटकम) अधिक चांगले कसे मिळू शकेल या गोष्टीकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे असल्याने प्रत्येक विभागाने ज्यांच्याकडून महिला आणि बालकांच्या विकास योजनांची अंमलबजावणी होते त्यांनी जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
जेंडर बजेट स्टेटमेंट केल्याने केवळ निधीच्या रकमा बदलायला नको तर त्यामुळे खरचं महिला आणि बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला का, महिला सक्षम झाल्या का हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. सामाजिक सुरक्षा देताना त्यांना रोजगारातून स्वावलंबी करण्याचा विचार या संकल्पनेतून पुढे गेला पाहिजे. गुणवत्तेचा संबंध मूल्यमापनाशी निगडित असल्याने योजनांची अंमलबजावणी करताना त्याच्या गुणवत्तापूर्ण फलितसाठी “क्लचर ऑफ इव्हॅल्युवेशन” ची संकल्पना राज्यात रुजली पाहिजे, असेही ते म्हणाले.
इनोव्हेटिव्ह स्पेंडिंग वाढावे- पंकजा मुंडे
राज्यात महिला व बालकांच्या विकासासाठी काम करताना इनोव्हेटिव्ह स्पेंडिंग वाढावे अशी अपेक्षा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. उपलब्ध निधीचा गुणवत्तापूर्ण खर्च ही बाब महत्वाची असून नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीतून महिला व बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, केवळ निधी पुरता हा विषय सीमित नाही. कौशल्य विकास, लोकसहभाग, महिलांचे आर्थिक स्वावलंबन, प्रशिक्षण, महिला व बालकांचे पोषण या बाबी देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना खेळांसाठी प्रोत्साहित करणे, अल्पसंख्याक, आदिवासी महिलांचा जेंडर बजेटिंगमध्ये प्राधान्याने विचार करणे, योजनांच्या अंमलबजावणीबरोबर त्याच्या रिझल्टचे मॉनेटरिंग करणे, त्यावर काम करणे, विभागांच्या निधीचा विचार करतांना वेतन आणि प्रत्यक्षात योजनांवर होणारा खर्च विचारात घेणे, यासारख्या बाबीही यात महत्वाच्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रहाटकर यांनी यावेळी जेंडर बजेटिंगसाठी करावयाच्या कृति आराखड्याचे सादरीकरण केले. जेंडर बजेटिंग, पब्लिक फायनांस मॅनेजमेंट फॉर विमेन ॲण्ड चिल्ड्रेन या विषयावर आज युनिसेफच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. राज्यात या विषयाच्या अनुषंगाने केलेल्या सखोल अभ्यासानंतर यासंबंधीचा अहवाल डिसेंबर अखेर शासनास सादर करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीस यु एन विमेन, युनिसेफ, राज्य महिला आयोग, ऑक्सफर्ड पॉलीसी मॅनेजमेंट, मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलीसी आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
०००००
वि. 7295 29 कार्तिक, 1939(दु.2.20)
फोटोओळी :
कतारचे कौन्सल जनरल सैफ बिन अली यांनी
घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
मुंबई,दि. 20 : कतारचे कौन्सल जनरल सैफ बिन अली अल कशाशी अल्मोहन्नदी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





