यवतमाळ: समज देऊनही विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पत्नीच्या वागणुकीत बदल होत नाही. या कारणावरून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राळेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचे पिंपरी बुटी येथील मुलासह विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दरम्यान, या महिलेचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. पतीला हे समजल्यानंतर त्याने पत्नीला हे संबंध मिटवण्यास सांगितले. मात्र, महिलेने आपल्या प्रियकराला भेटणे थांबवले नाही. दरम्यान, गुरुवारी ती प्रियकरासोबत बोलताना पतीला दिसली. यावेळी प्रियकराने पळ काढला. परिणामी मयत महिलेच्या पतीने रागाच्या भरात तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या भावाला फोन करून तिला घेऊन जा, अन्यथा जीवे मारून टाकेल, अशी धमकी दिली.
त्यानंतर आरोपी पती आणि दीर दोघांनी महिलेला दुचाकीवर बसवून हातगाव ते पिंपरी मार्गावर असलेल्या एका धरणाजवळ नेले. तेथे तिला काठीने बेदम मारहाण केली. यानंतर तिला राळेगावकडे घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेचा भाऊ विठ्ठल याने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून प्रथम राळेगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनाक्रम वडगाव जंगल पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला. त्यानंतर वडगाव जंगल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार पवन राठोड, पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे करीत आहेत.



