नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सूचना
पंढरपूर दि.16 : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत, अशा सूचना कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी, सरकोली परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके, द्राक्ष व डाळींब बागाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी तहसिलदार बी.आर. माळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, विठ्ठल दबडे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, पंचायत समिती सदस्या राजश्री भोसले यांच्यासह, संबंधित विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषिराज्यमंत्री खोत म्हणाले,‘अवकाळी पावसामुळे परिसरातील सुमारे 700 ते 800 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, ज्वारी, मका, हरभरा,ऊस, द्राक्ष, डाळींब बाग, केळी, आंबा या प्रमुख पिकांचा समावेश आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे’.
