14 मे : हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. मान्सून अंदमानच्या दक्षिण समुद्र, निकोबार बेट, आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाने रविवारी दुपारी जाहीर केलं. त्या परिसरात पडत असलेला पाऊस, वाऱ्यांचा वेग या बाबी लक्षात घेऊन अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
पुढील ७२ तासात बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकुल स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं आहे. यापुर्वी हवामान विभागाने अगोदर 15 मेला मान्सून अंदमानला येईल असं जाहीर केलं होतं.
गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून ९६ टक्के होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे़.
सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचं आगमन २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होतं. त्यानंतर २५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते. त्यानंतर १ जून रोजी केरळ इथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़. त्यात काही वेळा पुढे मागे होतात. आताची पोषकस्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण 6 दिवस लवकर मान्सूनचे आगमन झालं आहे.त्याची पुढील वाटचाल कशी असेल यावर तो केरळला आणि महाराष्ट्रात कधी पोहोचेल, हे समजून येईल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





