मारुती भापकर यांची मागणी : शिवसेनेलाही “घरचा आहेर’
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यात तीन वर्षांत नऊ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमी नाही यासह अन्य प्रश्नाकडे भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष दानवे शेतकऱ्यांना लाखोली वाहात आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. शिवसेनेने सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांबाबत दुटप्पी भूमिका घेतली असल्याचे सांगत भापकर यांनी शिवसेनेलाही “घरचा आहेर’ दिला आहे.
यासंदर्भात मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की. भाजपने 2014 लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु, शेतमालास हमीभाव देवू आदी आश्वासन देवून त्यांची पूर्तता अजूनही केलेली नाही. तर राज्यातील युती सरकारमध्ये शिवसेना सहभागी होवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केलेली आहे. परंतु, शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे.
शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन शेतमाल व फळांचे उत्पन्न घेतले. हा शेतमाल मातीमोल भावाने विकला जात आहे. काही वेळा तो फेकूनही दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वाचाळ वक्तृत्व करत लाखोली वाहात आहेत. त्यांचा समाजातील सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी भाजप त्यांना पाठीशी घालत आहे. तसेच, दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी व्यक्त केलेल्या मताचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा जावई शोध महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त करीत संवाद यात्रेचे दानवे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यात दानवे यांच्या विरोधात उमटलेली प्रतिक्रिया लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा संवाद यात्रेत दानवे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्यास “जोडे मारो’ आंदोलन न करता, दानवेंचे प्रत्यक्ष कृती केली जाईल, असा इशारा मारुती भापकर यांनी दिला आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





