पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या मतमोजणीतून ‘आप’च्या झाडूपुढे काँग्रेसचा आणि भाजपचा सफाया झाल्याचं दिसून आलं आहे. अर्थातच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कामाला दिल्लीकरांनी भरघोष मतदानाद्वारे ‘पोहोच पावती’ दिली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. २०१५ च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात ६२ जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला ८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही.
या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच स्तरातून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन होत आहे.
निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांचे खूप खूप अभिनंदन. , दिल्लीकरांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा असं ट्वीट मोदींनी केलं आहे. दिल्लीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी केजरीवालांचं अभिनंदन केलं आहे.
दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी देखील ट्वीट करून केजरीवालांचं अभिनंदन केलं आहे. तसंच आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असं त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं.
पंतप्रधान मोदींच्या या ट्वीटला अरविंद केजरीवाल यांनीही तात्काळ उत्तर दिले आहे असून त्यांनी मोदींचे आभार मानले. तसेच मी राजधानीला जागतिक स्तराचे शहर बनवण्यासाठी अत्यंत जोरकसपणे काम करत आहे, असेही केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल यांचं अभिनंदन करताना म्हटलं, “दिल्लीच्या जनतेनं आपला कौल दिला आहे.
एकूण जागा घोषित: |
70 / 70
|
दिल्लीमधील निकाल स्पष्ट झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. “दिल्लीकरांनी मला मुलगा मानलं आणि तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला. ज्यांना स्वस्त वीज मिळाली, शिक्षण मिळालं, चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या, अशा प्रत्येक दिल्लीकराचा हा विजय आहे,” असं केजरीवाल यांनी म्हटलं.
“दिल्लीकरांचे आभार मानताना केजरीवाल यांनी अजून एकाचे आवर्जून आभार मानले. आज मंगळवार आहे. हनुमानाचा वार आहे. हुनमानजींचेही या विजयासाठी आभार,” असं केजरीवाल यांनी म्हटलं.
केजरीवाल यांनी प्रचाराच्या काळात हनुमान मंदिराला दिलेली भेट, हनुमान चालिसा आणि त्यावर भाजप नेत्यांनी केलेली टीका काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. त्याच अनुषंगानं केजरीवाल यांनी न विसरता हनुमानाचे आभार मानले.
“दिल्लीत एका नवीन राजकारणाची सुरुवात झाली आहे, जो देशासाठी शुभ संकेत आहे. हेच राजकारण आपल्या देशाला एकविसाव्या शतरात घेऊन जाईल,” असंही केजरीवालांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंकडून केजरीवालांचं अभिनंदन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. “दिल्लीतील जनतेने देशात ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ चालणार असल्याचं दाखवून दिलं आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
“अरविंद केजरीवाल यांची दहशतवाद्यांशी तुलना करून, स्थानिक प्रश्नांवरून दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा केजरीवालांचा पराभव करता आला नाही. दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे राहिली. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला,” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
‘भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही’- शरद पवार
या पराभवाचं मला आश्चर्य वाटत नाही आणि हे होणारच होतं. ही पराभवाची मालिका आहे आणि आता ही थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या विजयानंतर व्यक्त केली.
“दिल्लीमध्ये भाजपकडून धार्मिक कटुता कशी वाढेल याची काळजी जाणीवपूर्वक घेतली. सत्तेतले लोक ‘यांना गोळी घालू’ अशी भाषा जाहीरपूर्वक करत होते. हा सगळा मर्यादा सोडून भूमिका घेण्याचा प्रयत्न होता. दिल्लीकरांना हे मान्य झालं नाही,” असंही शरद पवार यांनी म्हटलं.
या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केलं आहे. भाजप ही देशावरील आपत्ती आहे आणि सगळ्यांनी मिळून ती दूर करायला हवी, अशी भावना सर्व विरोधकांमध्ये वाढीस लागताना दिसत आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर भाजपचा पराभव होईल.
भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतला पराभव स्वीकारला आहे. त्यांनी म्हटलं, “आम्ही अजून कष्ट करू जेणेकरून पुढच्या विधानसभा निवडणुकीत आमची कामगिरी सुधारता येईल. जर ही निवडणूक शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यावर झाली असती तर शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया पटपडगंजमधून पिछाडीवर नसते.”
तर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्लीमधल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. “दिल्लीचा जो काही निकाल लागला आहे, त्यासाठी मी जबाबदार आहे.”
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी दिल्लीतल्या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, “भारत आणि पाकिस्तानदरम्यान मॅच सुरू होती. भारत जिंकला आहे.”
काँग्रेसकडूनही ‘आप’चे अभिनंदन
काँग्रेसचे लोकसभा गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी आपचं अभिनंदन केलं आहे. “सर्वांना माहीत होतं की आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्तेत येईल. काँग्रेसचा पराभव दुःखद आहे. आम आदमी पक्षाचा विजय हे भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाला प्रत्युत्तर आहे,” असं मत चौधरी यांनी व्यक्त केलं.
भाजपच्या अहंकाराला जनतेनी नाकारलं असं मत शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केलं.





