Pandharpur Live-
पंढरपूर (संतोष हलकुडे)- पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना सध्याच्या पिढीची मात्र वाताहत होत आहे . त्यामुळे नको त्या गोष्टींना सध्याच्या युगात नाहक महत्व दिले जात आहे. असे असतानाच स्वेरी संचलित एम.बी.ए. विभागामधील विद्यार्थ्यांनी मात्र ‘व्हेलेंटाईन डे’ ला फाटा देत अनपेक्षितरित्या ‘रोटी डे’ साजरा करून सर्वांना सुखद धक्का दिला. विद्यार्थ्यांनी सांघीकरित्या केलेल्या कार्याची दखल आज सारा महाराष्ट्र घेत आहे.
तंत्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उपक्रमात देखील ‘स्वेरी’ नेहमीच अग्रेसर असते. हा उपक्रम देखील असाच अदभूत व अनुकरणीय होता. त्याचे झाले असे की, मागील संपूर्ण आठवडा चॉकलेट डे, टेडी डे रोज डे प्रॉमिस डे, हग डे अशा विविध ‘डे’नी साजरा झाला. या ‘डे’ मधून फायदा काहीही नसला तरी क्षणिक आनंदासाठी अकारण पैशाची उधळपट्टी मात्र झाली. सोशल मीडियातून तर महापूरच आला होता. यातून एक पोस्ट मात्र लक्ष वेधून घ्यायची ती म्हणजे “ काश ‘रोटी डे’ भी होता, तो आज एक दिन के लिये गरीब भुके न रहते.’ बस्स! या वाक्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या एम.बी.ए.चे विभाग प्रमुख प्रा. करण पाटील यांची झोप उडाली. काहीतरी ‘हटके’ सामाजिक उपक्रम करावेसे मनात आले. त्यांनी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार यांच्या सहकार्याने एम.बी.ए. मधील प्रथम व द्वितीय वर्ष मधील विद्यार्थ्यांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहता पाहता सर्वांनी प्रतिसाद दिला.
ठरला तो दिवस, ठरले ते ठिकाण आणि निवडला तो ‘प्रेम’ दिवस! अर्थात १४ फेब्रुवारी! झालं! प्रत्येक विद्यार्थी योगदानांसाठी पुढे सरसावला. प्रत्येकांनी स्वतःच्या घरून कोणी मिठाई, फळे, चपात्या तर कोणी भाकऱ्या आणल्या. प्रथम वर्षाचे व दुसऱ्या वर्षाचे जवळपास १२० विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी वलटे यांच्यासह एम. बी. ए. विभाग आपली मोहीम फत्ते करण्यास निघाले. प्रथम सर्वांनी गोपाळपुरातील ‘श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम’ गाठले. स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम पाहून ‘मातोश्री वृद्धाश्रमा’मधील अनेक वृद्धांचे डोळे पाणावले. ‘आमची मुले, आमचा नातू एवढीच मोठी झाली असावीत’ असे म्हणत. पदराने डोळे पुसत विद्यार्थ्यांनी आणलेले अन्न हसतमुखाने घेतले. याप्रसंगी वृद्धांसमवेत साधलेल्या संवादामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींना रडू कोसळले. उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून मात्या-पित्यांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही’ असे सर्वांकडून वचन घेतले. जेवण होईपर्यंत तास दोन तास विद्यार्थी त्यांच्यासमवेत गुज-गोष्टी केल्या. यावेळी वृद्धांची कहाणी ऐकून गौरी पवार आणि तृप्ती कुलकर्णी या विद्यार्थीनी अक्षरशः धाय मोकलून रडल्या. पुन्हा त्यांनी मोर्चा वळविला रिद्धी-सिद्धी गणेश मंदिरामागे असलेल्या कुष्टरोगी वसाहतीकडे.
तिथे प्रत्येक घरी अन्नदान व फळे वाटप केली. तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून दत्त घाटानजीकच्या पायरीकडे गेले. तेथे असलेल्या सर्व भिक्षुकांना फळे व अन्नाचे पॅकेट देण्यात आले. पाचशेहून अधिक नागरिकांना अन्न दिल्याचे समाधान मिळाल्याने सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले होते. स्वेरीने ‘रोटी डे’ च्या रूपाने हा अदभूत कार्यक्रम साजरा केला. पैशाचा अपव्यय न करता वेळ आणि पैसा सत्कारणी लावला तो ‘स्वेरी’ने! याचीच चर्चा दिवसभर पंढरपूर पंचक्रोशीत होत आहे. खरंच, अनुकरण करण्यासारखा आणि प्रेरणादायी उपक्रम केला स्वेरीने! आजकाल अफाट खर्च करून जे वाढदिवस साजरा करतात अशांना स्वेरीने केलेला हा उपक्रम खूप काही शिकवून जाईल हे मात्र नक्की!






