👁 6 Views

आपत्कालीन स्थितीत धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत

Pandharpur Live-        
‘५.७.२०२० या दिवशी व्यासपौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात; परंतु या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने आपण एकत्रित येऊन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करू शकत नाही. 


येथे एक महत्त्वाचे सूत्र असे आहे की, हिंदु धर्माने आपत्काळासाठी धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. 


आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दळणवळण बंदी (लॉकडाऊन ) आहे. या काळातच  गुरुपौर्णिमा येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या पद्धतीने या वेळी हा महोत्सवाच्या रूपात आपल्याला ही साजरी करता येणार नाही. या दृष्टीने प्रस्तुत लेखात सध्याच्या दृष्टीने धर्माचरण म्हणून काय करता येऊ शकेल, याचा विचारही करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितियत्व अधोरेखित होते.

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी बहुतेक जण त्यांच्या श्री गुरूंकडे जाऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार कुणी श्री गुरु, कुणी माता-पिता, कुणी विद्यागुरु (ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, ते शिक्षक), कुणी आचार्यगुरु (आपल्याकडे परंपरागत पूजेसाठी येणारे गुरूजी), तर कुणी मोक्षगुरु (ज्यांनी आपल्याला साधनेची दिशा देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, ते श्री गुरु) यांच्याकडे जाऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आपण घरी राहून भक्तीभावाने श्री गुरूंच्या छायाचित्राचे पूजन किंवा मानसपूजन भावपूर्ण केल्यानेही आपल्याला गुरुतत्त्वाचा एक सहस्र पटीने लाभ होईल. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार उपास्यदेवता, संत किंवा श्री गुरु निराळे असले, तरी गुरुतत्त्व एकच असते.
२. संप्रदायातील सर्व भक्तांनी पूजनाची एक वेळ निश्‍चित करून शक्यतो त्याच वेळेत आपापल्या घरी पूजन करावे. ‘एकाच वेळेत पूजन केल्याने संघटित शक्तीचा अधिक लाभ होतो’, यासाठी सर्वानुमते शक्यतो एक वेळ निश्‍चित ठरवून त्या वेळी पूजन करावे.

अ. सकाळची वेळ पूजनासाठी उत्तम मानली आहे. ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य आहे, त्यांनी सकाळची वेळ ठरवून त्या वेळी पूजा करावी.

आ. काही अपरिहार्य कारणामुळे ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य नाही, त्यांनी सायंकाळची एखादी वेळ निश्‍चित करून त्या वेळी; परंतु सूर्यास्तापूर्वी, म्हणजे सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी पूजा करावी.

इ. ज्यांना ठरवलेल्या निश्‍चित वेळेत पूजा करणे शक्य नाही, त्यांनी आपापल्या वेळेनुसार; मात्र सूर्यास्तापूर्वी पूजा करावी.

ई. प्रत्येकाने आपापल्या संप्रदायानुसार श्री गुरु वा उपास्यदेवता यांचे चित्र, मूर्ती किंवा पादुका यांचे घरी पूजन करावे.

उ. चित्र, मूर्ती किंवा पादुका यांना गंध लावून पुष्प वहावे. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून पंचोपचार पूजा करावी. नंतर श्री गुरूंची आरती करावी.

ऊ. ज्यांना साहित्याच्या अभावामुळे प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नाही, त्यांनी श्री गुरु किंवा उपास्यदेवता यांची मानसपूजा करावी.

ए. नंतर श्री गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा. श्री गुरु आपल्या आयुष्यात आल्यानंतर आलेल्या अनुभूतींचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

ऐ. त्या वेळी ‘वर्षभरात आपण साधनेत कुठे न्यून पडलो ? आपण श्री गुरूंची शिकवण किती प्रमाणात आचरणात आणली ?’, याचेही सिंहावलोकन करून त्यावर चिंतन करावे.’

सौजन्य : सनातन संस्था
संपर्क क्रमांक : ९९७५५९२८५९

(सदर लेखात व्यक्त झालेले विचार, मतं हे संबंधित लेखकाचे आहेत.
– संपादक (पंढरपूर लाईव्ह)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *