जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर गावात विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पती आणि पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या कुकडेश्वर गावात घडली आहे. या दाम्पत्याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सागर बाळू दिवटे आणि नाजूक सागर दिवटे असे बुडून मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
सागर आणि नाजुका यांच्या सहा महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला होता. त्यामुळे दोघांचाही संसार नव्याने सुरू झाला होता. नाजूका ही घराजवळ असलेल्या संपूर्ण भरलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती.
कपडे धूत असताना नाजुकाचा विहिरीच्या काठावरून पाय घसरला आणि ती पाण्यात बुडू लागली. तिने जोराने आरडाओरडा करण्यात सुरुवात केली.
तिचा आवाज ऐकून तिचा पती सागर हा विहिरीजवळ आला. तिला वाचवण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली.
आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा आरडाओरडा कुणाला ऐकु गेला नाही. सागरला देखील पोहता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळाने विहीरीकाठी गाणी सुरू असलेला मोबाईल व विहिरीत बादली पडल्याचे आढळली.
त्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्याचे जवळच्या नागरिकांनी सांगितले. त्यांचा सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार अर्ध्यावरच संपला.





