औरंगाबादच्या इसारवाडी फाट्याजवळील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर आज सकाळी 6 वाजता भीषण अपघात झाला असून, ज्यात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर यात मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस आणि बैलगाडीचा हा अपघात झाला असून, ज्यात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कलीयाबाई गोविंद गिरे आणि आर्जुन गोविंद गिरे असे मृत आई-मुलाचं नाव आहे.
तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हे सर्व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मानिकपुंद येथील रहिवासी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याच्याजवळ असलेल्या इंडियन हॉटेलजवळ गंगापूर आगाराच्या बसने (क्रमाक एमएच 14 बीटी 2500) ऊस तोडीला जाणाऱ्या बैलगाडीला जोराची धडक दिली. बसचा वेग अधिक असल्याने बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
तर या अपघातात बैलगाडीत बसलेल्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बैलगाडी चालवत असलेले मृत महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव करत जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.






