दाक्षिणात्य सिनेमासारखा ड्रामा हैदराबादच्या जवळ असलेल्या मानेगुडा परिसरात पाहायला मिळाला.
पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणीची सुटका केली आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात तिची सुटका केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी 31 लोकांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातला मुख्य आरोपी नवीन रेड्डीही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरित्या याला दुजोरा दिली नाही.
शुक्रवारी (9 डिसेंबर) नवीन रेड्डी नावाचा एक माणूस 50 हून अधिक लोक घेऊन दामोदर रेड्डी यांच्या घरात घुसला. दामोदर रेड्डी हे हैदराबादच्या जवळ असलेल्या मानेगुडा परिसरात राहतात.
दामोदर रेड्डी यांच्या मुलीचा वैशालीचा साखरपुडा सुरू होता.
नवीन रेड्डी आणि त्याच्यासोबत घुसलेल्यांनी घरातल्या लोकांवर हल्ला चढवला, वस्तूंची तोडफोड केली आणि वैशालीला जबरदस्तीने घेऊन गेले. त्यांनी तिथले सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले. या हल्ल्यानंतर दामोदर रेड्डी यांच्या नातेवाईकांनी लगेचच महामार्गावर धरणं आंदोलन सुरू केलं आणि मुलीच्या सुटकेची मागणी करायला सुरूवात केली. नवीन रेड्डी हा ‘मिस्टर टी’ नावाची टी शॉप्सची साखळी चालवतो. दामोदर यांच्या घरासमोरच त्याचं एक दुकान आहे. ते सुद्धा दामोदर यांच्या नातेवाईकांनी पेटवून दिलं
दामोदर रेड्डी यांच्या तक्रारीनंतर आयपीसीच्या कलम 147,148,307,324,363,427,506,452,380 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
वैशालीचे वडील दामोदर रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणे, “माझी मुलगी बॅडमिंटन खेळायला जायची, तेव्हा नवीन रेड्डीला भेटली होती. तेव्हापासून तो तिला त्रास देत आहे. प्रेम आणि लग्नाच्या नावाखाली त्यानं तिला त्रास दिला.
शुक्रवारी 50 लोकांनी माझ्या घरावर हल्ला केला. यामध्ये नवीन रेड्डी आणि रुबेन यांचाही समावेश होता. ते व्होल्वो, बोलेरो आणि इतर गाड्यांमधून आले. सोबत त्यांनी दगड आणि लोखंडी सळया आणल्या होत्या. नवीनने लोखंडी सळईने मला मारहाण केली. माझ्या मित्राने त्याला अडवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यालाही त्यांने मारलं.”
“नंतर ते जबरदस्तीने माझ्या मुलीला गाडीत कोंबून घेऊन गेले.”
घरातील सामानासोबतच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केल्याचं दामोदर रेड्डींनी पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.



