गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून एक मोटार आरामबसला धडकली. या अपघातात नऊ जण ठार, तर २९ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नवसारीचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश उपाध्याय यांनी सांगितले, की पहाटे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही बस बलसाडकडे जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या मोटारीच्या (एसयूव्ही) धडकेमुळे हा अपघात झाला.
या मोटार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बसला धडकण्यापूर्वी ती वेगात दुभाजक ओलांडून पलीकडे गेली.
या धडकेने मोटारीचा चक्काचूर झाला. मोटारीत प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झाला. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचाही मृत्यू झाला. ही मोटार भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वरला जात होती.
२९ प्रवासी जखमी प्रवाशांवर नवसारी व शेजारील बलसाड शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला व प्रत्येक मृताच्या कुटुंबीयास दोन लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.



