संक्रातीनिमित्त मैत्रीणींना हळदी कुंकवासाठी घरी बोलावल्याने वाणाचे सामान आणून घरी परत येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
माया श्याम जाधव (42, मुळ रा. लिंबागणेश, सध्या रा. धांडेनगर, बीड) असे मृत्यू झालेल्या महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्या बीड पोलिस दलातील पेठ पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदावर कार्यरत होत्या. माया यांचे पती श्याम जाधव हे बीड पोलिस उपाधीक्षक कार्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
माया जाधव यांनी घरी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी वाण आणण्यासाठी त्या आणि त्यांचे पती मोटारसायकलवरून खरेदीसाठी बोहर गेले होते.
परत येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये माया जाधव या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दि. 20 जानेवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



