सोलापूर : ऊस गाळप सुरू होऊन अजून महिनाही पूर्ण होत नाही, इतक्यात धोकादायक ऊस वाहतुकीचा आठवड्याला एक बळी गेला आहे. रिफ्लेक्टरविना ट्रॅक्टरची रस्त्यावर होणारी वाहतूक व एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली लावून होत असलेल्या वाहतुकीमुळे हे अपघात होत आहेत.
गाळप सुरू झाल्यापासून एका महिन्यातच चारजणांचे बळी गेले आहेत.
प्रत्येक वर्षी ऑक्टोबर ते मार्च असा सुमारे सहा महिने कारखान्यांचा गाळप हंगाम चालतो. जिल्ह्यात ३९ साखर कारखाने सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत उसाची लागवड केली जाते.
सर्व तालुक्यांतील रस्त्यांवर सहा महिन्यांपर्यंत ऊस वाहतूक सुरू असते. मात्र, कुठेही वाहतूक नियम पाळले जात नाहीत. परिणामी, दरवर्षी शेकडो दुचाकीचालकांचे जीव जात आहेत.
यावर वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयही मूग गिळून गप्प आहे. ऊस वाहतूकदार आणखी किती लोकांचे जीव घेणार आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य दुचाकीचालकांमधून विचारला जात आहे. अपघाताची नोंद झालेल्या घटना चारच असल्या तरी आपसांत तडजोड झालेले अनेक अपघात समोर आलेले नाहीत. यामुळे धोकादायक ऊस वाहतुकीवर योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.



