👁 8 Views

शेतकरी १ जूनपासून संपावर? ३ एप्रिलला पुणतांब्यात होणार ग्रामसभा.. शेती प्रश्‍नांबाबत राज्यभर केला जाणार जागर

Pandharpur LIVE 28 March 2019


औरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून केलेल्या सर्व प्रयत्नांचे परिणाम पाहता १ जूनपासून संपावर जाण्याचा विचार पुणतांबा (ता. राहाता, जि. नगर) येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतन बैठकीत पुढे आला. या बैठकीतील निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात पहिली ग्रामसभा येत्या ३ एप्रिलला पुणतांबा येथेच घेतली जाणार आहे. यानंतर शेतीप्रश्‍नांबाबत राज्यभर जागर करण्यासंदर्भातही निर्णय होण्याची शक्यता आहे.
ग्रामसभेत याविषयी होणार ठराव…

  • – स्वामिनाथन आयोग लागू करा.
  • – शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
  • – ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा.
  • – कृषीपंपांना मोफत वीजपुरवठा करा.
  • – सर्व पिकांना शाश्‍वत विमा संरक्षण द्या.

एकीककडे राज्य विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर रणकंदन सुरू असतानाच आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाण असणाऱ्यांनी याविषयी निर्धारपूर्वक लढा देण्याची तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील डोणगावचे शेतकरी धनंजय धोर्डे यांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी याविषयी संवाद साधला. त्यामधून नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शेतकऱ्यांची चिंतन बैठक शुक्रवारी (ता.२४) पार पडली.
शासनकर्ते कोणतेही असो शेतकऱ्यांचे प्रश्‍न कायमच राहताहेत. मुख्य प्रश्‍नांना बगल देऊन शेतकऱ्यांना कायम आशेवरती ठेवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे निराशा पदरी आलेले शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. शासन व प्रशासनाच्या प्रक्रियेत ग्रामसभेला सर्वोच्च मानले गेले असल्याने, आता या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍काची निर्धारपूर्वक लढाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍कासाठीची पहिली ग्रामसभा पुणतांबा येथे ३ एप्रिलला घेतली जाणार असल्याची माहिती श्री. धोर्डे व डॉ. धनंजय धनवटे यांनी दिली. 

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 


शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांबाबत लवकरच राज्यभर जनजागरण केले जाणार असून, प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी चिंतन बैठकीतील विषयावर ग्रामसभा व जागर केला जाणार असल्याचेही श्री. धोर्डे यांनी स्पष्ट केले. या चिंतन बैठकीला धनंजय धोर्डे यांच्यासह डॉ. धनंजय धनोटे, ॲड. मुरलीधर थोरात, सुहास वहाडणे, धनंजय जाधव, सुभाष वहाडणे, बाळासाहेब चव्हाण, अभय चव्हाण, धनंजय सांगळे, अशोक धनवटे, बाळासाहेब भोरकडे, विजय धनवटे यांच्यासह जवळपास ४५ शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
………..
….तर शेतकरी जातील संपावर
३ एप्रिलपासून ग्रामसभांच्या ठरावानिशी शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍काच्या मागण्यांबाबत सरकारला निर्णय घेणे भाग पडण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय घेणे, तसे ठराव प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला पाठविण्याचे धोरण अवलंबिले जाईल. टप्प्याटप्याने राज्यात सर्वदूर अशा ग्रामसभा व ठराव घेऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍काचा  लढा शांततेच्या मार्गाने लढला जाईल. त्यानंतरही शासनाने न्यायाचित निर्णय न घेतल्यास १ जुनपासून शेतकऱ्यांनीही स्वत:पुरतेच पिकवून संपावर जावे, याविषयीचे निर्णय गावागावात घेतले जातील, असे या चिंतन बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती श्री. धोर्डे यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *