पंढरपूर/ प्रतिनिधी:- सत्ताधारी आणि विरोधातील आमदार, खासदार पुढच्या आणि मागच्या दारातून आपली कारखानदारी टिकवण्यासाठी कामे करून घेतात. परंतु आम्ही मात्र सत्तेबाहेरील आणि विरोधातील आमदार-खासदार नसल्याने आमची कोणतीही कामे होत नव्हती. याशिवाय आमच्या सोबत असलेल्या शेतकर्यांचीही कामे होत नव्हती; म्हणूनच कारखानदारी आणि शेतकर्यांना न्याय देण्यासाठी भाजप प्रवेश करीत असल्याची भूमिका सहकारी शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपल्या समर्थकांसमोर मांडली आणि समर्थकांच्या साक्षीने भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक कल्याणराव काळे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडवली होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत साखर कारखानदारी वरील संकट दूर करण्याचा शब्द घेत कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले होते. यासाठी आपल्या समर्थकांना एकत्र बोलावून येथील इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालयात काळे यांनी आपल्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. आपल्या समर्थकांना आपली भूमिका सांगताना त्यांनी सध्याचे आमदार भारत भालके यांच्यावरही आरोप केले विरोधी आमदार असल्याने आपल्या कारखान्याची अडचण सत्ताधार्यांकडून सोडून घेताना आमचा विचार कोणीही केला नाही. अशी खंत काळे यांनी आपल्या समर्थकांना समोर व्यक्त केली.
कारखान्याची अडचण सोडविण्यासाठी एकतर सत्तेत असावे लागते नाहीतर विरोधी पक्षाचा आमदार असावे लागते अशी महत्त्वाची टिप्पणी कल्याणराव काळे यांनी आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात केली. आणि सध्या साखर कारखानदारी चालविण्यात किती अडचणी आहेत. हे बोलून दाखवले सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सिताराम साखर कारखाना आणि सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना हे कारखाने अनेक वर्षापासून उत्तम तर्हेने चालवले आहेत. याशिवाय निशिगंधा बँक, प्रतिभा नागरी सहकारी पतसंस्था, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था, जनकल्याण हॉस्पिटल, कै. वसंतराव काळे विद्यालय आणि महाविद्यालय अशा अनेक संस्था अनेक वर्षापासून चालविल्या आहेत. या संस्था चालवण्यासाठी कल्याणराव काळे हे कायमच सत्तेच्या बाजूने राहिले होते. गेल्या चार वर्षात ते विरोधात असल्याने आपल्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागल्याचे त्यांनी या मेळाव्यात कबूल केले. आणि त्यांच्या मुख्य साखर कारखानदारीच्या संदर्भातील हानीमुळे होणारे शेतकर्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे या मेळाव्यात जाहीर करून टाकले.
येत्या दोन-चार दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माढा येथे कल्याणराव काळे यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या या प्रवेशाच्या निर्णयाचे समर्थकांनी जोरदार स्वागत होत आहे.

