नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अनेक जण विविध मार्गांनी आपला आवाज उठवत असतानाच नागपुरात एका महिलेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे. भारतमातेचे प्रतिकात्मक रुप धारण करुन चित्रकार श्वेता भट्टड यांनी स्वत:ला तब्बल साडेतीन तास जमिनीखाली गाडून घेतलं.
शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.
नागपुरात जनमंचने शेतकऱ्यांची एक रॅली ठेवली होती. श्वेता यांनी शवपेटीमध्ये दोन तास स्वतःला विश्वास, विश्वास असा शब्द लिहित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बंद करुन घेतलं. आत ऑक्सिजनची सोय करण्यात आली होती आणि श्वेता यांची हालचाल सतत नियंत्रित करता यावी म्हणून आत
सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते. डॉक्टरांनी आधी त्यांची तपासणी केली.
श्वेता यांनी या आंदोलनाला यश येईल या आशेने पूर्णवेळ एका वहीत विश्वास, विश्वास असे लिहिण्याचे ठरवले. यावेळी त्यांची आईही सोबत होती. श्वेता यांनी यापूर्वीही शवपेटीमध्ये स्वतःला बंद करुन लक्ष वेधलं आहे.
