पत्रकार हल्लाविरोधी कायदा याच अधिवेशनात – मुख्यमंत्री
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – दिवसेंदिवस पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबविण्यासाठी आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित असलेल्या पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत हे आश्वासन दिले.
पत्रकार हल्लाविरोधी कृती समिति, मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे पदाधिकारी आणि वृत्तवाहिन्याचे (टी व्ही) प्रतिनिधी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा कायदा लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याचे संकेत दिले होते. भाजपाचे सदस्य आशिष शेलार यांनी आज पत्रकारांवरील हल्ल्याचा उल्लेख करून पत्रकारांच्या सुरक्षेविषयी विधानसभेत चिंता व्यक्त केली होती. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे संजय दत्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे , प्रकाश गजभिये आणि शिवसेनेच्या डॉ. निलम गोर्हे यांनीही परिषद सभागृहात पत्रकारांवरील हल्ल्यांसंदर्भात चिंता व्यक्त करून कायदा करण्याची मागणी केली होती. आशिष शेलार यांच्या मागणीला प्रतिसाद देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भातील विधेयकाचा मसुदा तयार असून हे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाईल. मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या विद्यमान कार्यकारिणीने याच काळात बैठक घेऊन पत्रकार हल्लाविरोधी कायद्यात उपयुक्त सुधारणा सुचवून शासनाला सादर केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आजच्या भूमिकेचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व मराठी पत्रकार परिषद स्वागत करत आहे आणि हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.
