👁 11 Views

दानवेंच्या पत्नी मोहोटादेवी दर्शनाला, म्हणाल्या- साहेब सरळ मार्गी, बोलण्याचा ठंग ग्रामीण

पाथर्डी – साहेबांचा स्वभाव सरळ मार्गी असून बोलण्याचा ढंग ग्रामीण आहे. शेतकऱ्यांविषयी वाईट भावना ठेवणारा माणूस अशी त्यांच्यावर होत असलेली टीका चुकीची आहे. विरोधकांचे समजू शकते, पण शिवसेनेने ज्या पद्धतीने भांडवल केलेे, त्याचे जास्त दुःख होते, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पत्नी निर्मला दानवे यांनी व्यथा बोलून दाखवली.
मोहटादेवीच्या महापूजेसाठी दानवे शुक्रवारी आल्या होत्या. समवेत त्यांची कन्या शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना जाधव, माजी जि. प. सदस्य शोभा मतकर, भोकरदनच्या नगरसेविका आशा माळी, अलका गाडेकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, माजी अध्यक्ष मुकुंद गर्जे, महादेव दहिफळे आदी होते. देवस्थान समितीचे विश्वस्त राजेंद्र भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी त्यांचे स्वागत केले.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावरून वादळ उठले आहे. पत्रकारांनी याबाबत निर्मला दानवे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता खासगी दौऱ्यानिमित्त आपण शेवगाव तालुक्यात आलो आहोत. कार्यकर्त्यांनी मोहटादर्शनाची इच्छा प्रदर्शित केली, म्हणून आपण आलो. “त्या” विषयावर मला काही बोलायचे नाही. अशा खूप चांगल्या-वाईट घटनांना सामोरे गेलो आहोत. देवदयेने सर्व संकटे दूर होतील, असे सांगत प्रतिक्रियेस त्यांनी नकार दिला.

सत्कारानंतर मात्र कार्यकर्त्यांशी त्या मनमोकळेपणाने बोलल्या.राजकीय वातावरण तापवून कोणाला काय साध्य करायचे आहे हे समजत नाही. शेतकऱ्यांना उद्देशून साहेब असं कसं बोलतील? गेली ३०-४० वर्षे सार्वजनिक जीवनात वावरणारा माणूस चुकीचे कसे बोलेल? कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कार्यकर्त्यांच्या समोर बोललेले शेतकऱ्यांसाठी बोलले असे भासवून कोणाला काय साध्य करायचे असेल, असे त्या म्हणाल्या.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *