👁 12 Views

जिल्हा बॅंकांच्या प्रश्नावर मार्ग काढा

अजित पवार यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) – नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांत हजारो कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या. केंद्र सरकारने मात्र हे पैसे स्वीकारण्यास नकार दिल्याने जिल्हा बॅंकांची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांच्यापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या प्रश्नावर मार्ग काढावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
जीएसटी विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना अजित पवार बोलत होते. नोटाबंदीनंतर शेतकछयांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांत हजारो कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या. केंद्र सरकारने मात्र हे पैसे स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन तोडगा काढण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व काही सुरळित होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप यावर काही निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांना शेती हंगामासाठी द्यायला पैसे उपलब्ध नसल्याने सरकारने यावर तातडीने मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली.

…तर हजारो कोटींचा बोझा पडेल
राज्य सरकारने अजूनही 21 हजार 630 कोटी रूपयांच्या करांची वसुली केलेली नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर ही करवसुली कशी होणार याचेही उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. करवसूली करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरच आता जीएसटीच्या वसूलीची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे ही वसूली न झाल्यास उद्या सरकारवर हजारो कोटींचा बोझा पडेल, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.
सत्ताधाऱ्यांनी जपून बोलावे
मुख्यमंत्री यांनी विरोधकांना निर्लज्ज म्हणून संबोधले होते. सत्ताधाऱ्यांनी बोलताना शब्द जपून वापरायचे असतात. एखादा नको असलेला शब्द तोंडातून निघून गेल्यानंतर काय होते हे मी चांगलेच भोगले आहे, असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *