स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसर स्वच्छ झाला आहे. या स्वच्छता मोहीमेदरम्यान जवळपास चार टन इतका कचरा संकलित करण्यात आला. या मोहिमेसाठी शेकडो तरुणांनी हातभार लावला होता.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती शुक्रवारी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या संचालिका अपर्णा कांबळे-बनसोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, नगरभूमापन अधिकारी दादा चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र राऊत, शहराच्या आरोग्य अधिकारी डॉ़ जयंती आडके, मुख्य आरोग्य निरिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल आराध्ये, श्री. जोगधनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या सहकार्यातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने ४ घंटा गाड्या पुरवल्या होत्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रतिक शिंगे यांनी केले तर स्वच्छता मोहिमेचे संयोजन अजय हक्के यांनी केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक :
हातामध्ये फावडे, कुदळ घेवून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक, शिक्षकेतर असे जवळपास २०० कर्मचारी सकाळी या मोहिमेत सहभागी झाले. राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचा अभिनव उपक्रम पाहून त्यांनी कौतूक केले. त्यांनी प्रकल्प संचालिका अपर्णा बनसोडे यांच्याशी संवाद साधत उपक्रमाचा थोडक्यात आढावाही घेतला.
या कार्यालयापासून निघाला ४ टन कचरा :
जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, ग्राहक न्याय मंच कार्यालय, नेहरु युवा केंद्र, कोषागार कार्यालय, माजी सैनिक कार्यालय, दक्षिण तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, करमणूक कार्यालय, आणि जिल्हा पुरवठा कार्यालय, महामंडळ आवार या साºया कार्यालयांच्या भोवतालचा परिसर स्वच्छ केला़ महापालिकेच्या आरोग्य विभागाने या उपक्रमाला साथ दिली आणि जवळपास ४ टन कचरा एका दिवसात निघाला.





