मुंबई, दि. 31 : आपत्ती परिस्थिती उद्भवल्यास शासकीय यंत्रणांनी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘आपत्ती व्यवस्थापन– माध्यमांची भूमिका’ याविषयावर विविध यंत्रणांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक संचालक (प्रशासन) अजय अंबेकर तसेच संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात पार पडली.
जनसंपर्क हा आपत्ती व्यवस्थापनातील महत्वाचा घटक आहे.त्यामुळे शासनाच्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम केलेपाहिजे. याकरिता सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांमधील संवाद अधिकाधिक वाढविणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले. तसेच अचानक दळणवळण यंत्रणा कोलमडल्यास कोणती उपाययोजना करावी, याबाबतही मंथन करण्यात आले. या बैठकीत वरिष्ठ उपसंपादक ज्ञानोबा इगवे यांनी दिग्दर्शित केलेली आपत्ती व्यवस्थापनावरील चित्रफित दाखविण्यात आली.
बैठकीस राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशिकर, विधानसभा अध्यक्षांचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी श्रीमती किर्ती मोहरील, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, आकाशवाणीच्या वृत्तसंपादक श्रीमती जयदेवी पुजारी स्वामी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपजनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बाफना, पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सी.डेविड, बेस्टचे उपजनसंपर्क अधिकारी मनोज वराडे, महावितरणचे सहमुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी श्रीमती नीता डोळस, मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव लीलाधर बनसोड, कल्याण डोंबिवलीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, एमएमआरडीएच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती सुचेता कदम तसेच महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारी विषयी माहिती दिली.




