👁 12 Views

‘जलयुक्त’मुळे १२ लाख हेक्टर सिंचनाखाली!

गेल्या अडीच वर्षांत जलसंधारणाच्या छोट्या कामांवर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केल्यामुळे सुमारे १२ लाख ५० हजार हेक्टर इतकी अधिक सिंचन क्षमता निर्माण करण्यात यश मिळाले. हेच काम मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून करण्यासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च आला असता. मात्र हे काम अवघ्या साडेपाच हजार कोटी रुपयांमध्ये झाले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जलयुक्त शिवार योजनेला राज्यातील जनतेने मोठा प्रतिसाद ‌दिला असून, या कामासाठी ५६० कोटी रुपयांचा लोकसहभाग मिळाला आहे. मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारणाच्या लहान कामांना दिलेले प्राधान्य कमालीचे यशस्वी ठरले असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.


‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाचे रविवारी विविध वाहिन्यांवरून प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना पाणी विषयावरील या कार्यक्रमासाठी राज्यातून १८ हजार जणांनी ई-मेल आणि एसएमएसद्वारे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सरकारी निधीची मोठ्या प्रमाणात बचत झाली. शिवाय लोकांना सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करण्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


जलयुक्त शिवार या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, ११ हजार गावे टँकरमुक्त करण्यात सरकारला यश आले. यापुढील काळातही शाश्वत जलसंधारण करणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची गावागावामध्ये प्रभावी अंमलबजावणी करून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


जलयुक्त शिवारची कामे फक्त नदी पात्रात न करता माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करणे गरजेचे आहे. सरकारने यावरही लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी ज्येष्ठ कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी केली. त्यांच्या सूचनेची दखल घेत जलसंधारणाची कामे करताना सरकार निश्चितच एरिया ट्रिटमेंटवर भर देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *