19 जून : दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेवून जर राजनाथ कोविंद यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केलं असेल तर त्यात शिवसेनेला रस नाही असं स्पष्ट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त केलीये. तसंच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊनच दाखवा, आम्ही भगवा फडकवूनच दाखवू असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं.
मुंबईतील ष्णमुखानंद सभागृहात शिवसेनेचा वर्धापन सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रपतीपदासाठी भाजपने रामनाथ कोविंद यांचं नाव पुढं केल्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी रामनाथ कोविंद यांच्या नावाबद्दल जाहीर नाराजी उघड केली.
शिवसेनेने कुणाच्या आडून राजकारण केलं नाही. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल उद्या सेना नेत्यांची बैठक बोलावली आहे. याबैठकीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. हिंदू राष्ट्र आहे, म्हणून आम्ही मोहन भागवतांचं नाव सुचवलं होतं. बरं ते ठिक शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून आम्ही राष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांचं नाव सूचवलं होतं. पण दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात नुसता हात नाही तर संपूर्ण पाठिंबा आम्ही दिलाय. वेड्या वाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरुन टाकणार असाल तर ते कागद मी फाडून टाकेन. शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर मोकळ्या मनानं आणि सढळ हातानं द्या असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं.
कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात कानडी सरकार मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार करतायत,मराठी माणसाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, हे मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहणारं सरकार नाही- उध्दव ठाकरे
मध्यावधीची पर्वा नाही, पण शेतकरी आत्महत्यांची चिंता वाटते. एवढीच जर हिंमत असेल तर मध्यावधी आता घ्या, आम्ही तयार आहोत असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.





