👁 10 Views

…तर मराठा क्रांती मोर्चा मुंबईतच तळ ठोकणार

सांगली : मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मराठा क्रांती मोर्चाने मुंबईतच तळ ठोकावा. प्रसंगी विधानसभेचा ताबा घ्यावा, अशी निर्णायक आंदोलन करण्याची मागणी शनिवारी मराठा कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. कार्यकर्त्यांच्या या मागण्या राज्याच्या समितीकडे पाठविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मार्केट यार्डमधील सभागृहात मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत होणाऱ्या ९ आॅगस्टच्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. यावेळी विलास देसाई म्हणाले की, अजूनही जिल्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे मराठा समाजाच्या लोकांवर दाखल होत आहेत. त्यामुळे याविरोधातील लढाई तीव्र करण्यात येईल. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करताना तो निर्णायक कसा होईल, याकडे आमचे लक्ष राहील. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेमधून मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते ८ आॅगस्ट रोजी विनातिकीट जातील. सर्व रेल्वेंचा ताबा आम्ही घेणार असल्याने त्यावेळी अन्य प्रवाशांची गैरसोय नको म्हणून आम्ही आजच त्यांना ८ आॅगस्टला प्रवास न करण्याचे आवाहन करीत आहोत. ट्रॅव्हल कंपन्यांनीही आम्हाला त्यादिवशी मोफत बसेस पुरवाव्यात, अन्यथा आम्ही त्यादिवशी त्या चालवू देणार नाही.

सतीश साखळकर म्हणाले की, आंदोलनातून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊनही निवडणुकीत एकी दिसत नाही. आपल्याला या गोष्टीची खंत वाटली पाहिजे. रेल्वेने जाण्याचा निर्णय चांगला असला तरी, खासगी ट्रॅव्हल्स रोखणे हे कायदा हातात घेण्यासारखे होईल. त्यामुळे समाजासाठी काम करणाऱ्या लोकांनी यासाठी मदत करावी. मी स्वत: पाच ट्रॅव्हलचा खर्च करणार आहे.

मनीषा माने म्हणाल्या की, समाजामध्ये एकमेकांत आपला समन्वय हवा. अ‍ॅट्रॉसिटीबद्दलही समाजातील लोकांमधून वेगवेगळी मते येत आहेत. त्यामुळे कोणत्याही मागण्या व भूमिकेबाबत सर्वांची एकवाक्यता दिसायला हवी. मुंबईतील आंदोलन निर्णायक होण्यासाठी आपण त्याठिकाणी थांबलेच पाहिजे. थांबल्याशिवाय राज्यकर्ते घाबरणार नाहीत.

अशोक पाटील म्हणाले की, भडकपणाने आंदोलन करण्यापेक्षा शिवरायांप्रमाणे आपण गनिमीकाव्याने आंदोलन केले पाहिजे. त्यासाठी समन्वय समिती नेमून आपण नियोजन करावे. नितीन चव्हाण म्हणाले की, आंदोलनाविषयी मते मांडत असताना ती नकारात्मक येत आहेत. आपण सकारात्मकतेने प्रयत्न केले पाहिजेत. आंदोलन करताना आपण कोणत्याही समाजघटकाविरोधात नाही, ही कल्पना आपण लोकांना दिली पाहिजे. समाजाच्या एकवटलेल्या ताकदीतून युवकांसाठी काहीतरी करायला हवे.

देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारण्यात येऊ नये. प्रत्येकाने स्वखर्चाने या मोर्चात सहभागी व्हायला हवे. संजय देसाई म्हणाले की, समाजासाठी काम करण्याची इच्छा असेल त्यांनी नावनोंदणी करावी. मुंबईतील मोर्चात काम करण्याचीही त्यांना संधी दिली जाईल. कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्व मागण्यांचा विचार आम्ही करू. त्या मागण्या राज्याच्या समितीपुढेही मांडण्यात येतील. आंदोलनाचे दोर मराठवाड्याकडे सरकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचा मराठा समाजाचा संयुक्तिक दबावगट निर्माण करता येईल का, याचाही विचार सुरू आहे.

रणजित पाटील म्हणाले की, मूक मोर्चानंतर आता पुढील मोर्चे कोणत्या पद्धतीने काढायचे, याबाबतही लवकरच निर्णय होईल. अर्जुन पाटील म्हणाले की, मुंबईत निर्णायक आंदोलन करायचे असेल तर, विधानसभेला घेराव घालण्यात यावा. एकाही आमदाराला बाहेर पडू न देण्याची जबाबदारी मी घेतो. माझ्यावर कितीही गुन्हे पोलिसांनी दाखल केले तरी, मी त्यास तयार आहे.

प्रवीण पाटील व धनंजय वाघ यांनी मोर्चाचे पूर्वनियोजन करताना सूक्ष्मपद्धतीने करावे, अशी मागणी केली. मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील म्हणाले की, प्रत्येक तालुक्यातून काम करू इच्छिणाऱ्या दहा कार्यकर्त्यांची नावे समन्वय समितीकडे द्यावीत. सांगली, मिरज शहरांमधूनही त्याचपद्धतीने नावनोंदणी होईल. त्याप्रमाणे स्वयंसेवकही नेमण्यात येतील. मुंबईत असलेल्या ‘आम्ही सांगलीकर’ या ग्रुपचीही मदत घेण्यात येईल. सांगलीतील लोकांनी मुंबईतील पाहुण्यांशी संपर्क साधून मोर्चापूर्वीच चार ते पाच दिवस अगोदर मुंबई गाठावी. मोर्चावेळी रुग्णवाहिकांचीही सोय करण्यात येणार आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा यशस्वी करण्यात येईल.

यावेळी माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील, ए. डी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, रवी खराडे, राहुल पवार, काका हलवाई, प्रदीप भोसले, योगेश पाटील, सर्जेराव पाटील, भाऊसाहेब पवार आदी उपस्थित होते.

समाजाचे बोधचिन्ह हवे

समाजात कुठेही वावरताना प्रत्येक मराठा समाजाच्या, व्यक्तीच्या पोशाखावर एक बोधचिन्ह असावे. जेणेकरून तो मराठा समाजाचा आहे, हे कळायला हवे. त्यामुळे एकमेकांना मदत करणेही सोयीचे होईल, असे एका कार्यकर्त्याने सुचविले.

आता दांडकं हातात घ्या!

आता मोर्चात सहभागी होताना सर्वांनी खोऱ्याचे दांडके काढून हातात घ्यावे. कोट्यवधी समाजबांधव ज्यावेळी दांडके घेऊन विधान भवनासमोर जातील, तेव्हाच त्यांना धडकी भरेल, असे मत एका कार्यकर्त्याने मांडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *