चर्चेपेक्षा बदला घ्या
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदीनं काहीही फरक पडला नाही, असा उपरोधिक टोला शिवसेनेनं लगावला आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा देशावरील आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारवरील हल्ला आहे. सरकारला हिंमत दाखवण्याची गरज आहे. चर्चेपेक्षा या हल्ल्याचा बदला घ्या, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
मुंबईत आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा देश आणि भाजपच्या सरकारवरील हल्ला आहे. दिल्लीच्या मजबूत सरकारवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, असं ते म्हणाले. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हिंमतवान सरकार आहे, हे दाखवून द्यायला हवे, असंही ते म्हणाले. या सरकारला हिंमत दाखवण्याची गरज आहे. केवळ निषेध करून चालणार नाही. सरकारने गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राइक केला. त्यानंतर दहशतवाद्यांची आर्थिक रसद कापण्यासाठी आणि सीमेवरील बनावट नोटांचा काळा उद्योग बंद करण्यासाठी नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेतला. पण सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदीमुळे काहीही फरक पडला नाही, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हे सरकारसाठी आव्हान आहे. केवळ चर्चा करण्यापेक्षा बदला घ्यायला हवा, असंही त्यांनी सांगितले. सीमेवर दहशतवादी हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. अनेक जवान आणि निष्पाप लोकांचा जीव जात आहे. हे थांबवायला हवे. दहशतवाद्यांविरोधात या सरकारने कठोर कारवाई करायला हवी, असंही त्यांनी सांगितले. अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली पाहिजे. सरकारची ती जबाबदारी आहे. ही यात्रा सुरळीत पार पडत नसेल तर या देशात हिंदूंना वाली कोण, असा सवालही त्यांनी केला.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











