पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
दि. 2 ऑगस्ट, 2017
दि. 2 ऑगस्ट, 2017
दि. 2 ऑगस्ट, 2017
दि. 2 ऑगस्ट, 2017
दि. 2 ऑगस्ट, 2017
दि. 2 ऑगस्ट, 2017
दि. 2 ऑगस्ट, 2017
दि. 2 ऑगस्ट, 2017
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 3 August 2017
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना
टोलमुक्त आणि सुरक्षित प्रवास
– एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोलमुक्त आणि सुरक्षित प्रवास करता येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट देणे व सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनेबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना दि. 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी आणि दि. 1, 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी पथकरातून सूट देण्यात येणार आहे. परिवहन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना पासेस आणि स्टिकर द्यावेत. सायन-पनवेल, खोपोली-पाली-वाकण रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत. गर्दीच्या वेळी जड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, क्रेन आणि रुग्णवहिका सेवा तयार ठेवाव्यात, अशा सूचना संबधितांना दिल्या.
या बैठकीला परिवहन आयुक्त प्रविण गेडाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी एल. ए. दराडे, वाहतूकचे सहआयुक्त अमितेश कुमार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000
वृ. वि. 6281 10 श्रावण, 1939 (दु. 4.20 वा.)
विधान परिषद प्रश्नोत्तरे :
फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी
कायद्यात सुधारणा करणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 2 : निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करता यावी आणि महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी (प्राईज चिट ॲन्ड मनी सर्क्युलेशन (बर्निंग) ॲक्ट) या मूळ कायद्यात सुधारणा करण्याची सूचना प्रस्तावित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
पुण्यातील टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि. या कंपनीने खोटी कागदपत्रे दाखवून पुणे, मुंबई, ठाणे येथील सुमारे चार हजार नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबाबत सदस्य अनिल भोसले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सदर कंपनीच्या मालकीची सुमारे तीनशे कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. यात जमीन, कार्यालय, चार बंगले आदींचा समावेश आहे. सक्षम प्राधिकरणामार्फत मुल्यांकन करुन या मालमत्तेची विक्री करुन पैसे ठेवीदारांना परत केले जातील. अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार जप्त केलेली मालमत्ता विकताना अडचणी येतात. यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
००००
मीरा-भाईंदर व वसई-विरार परिसराकरिता संयुक्त पोलीस आयुक्तालय
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 2 : मीरा-भाईंदर व वसई-विरार परिसराकरिता संयुक्त पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून या आयुक्तालयाला लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात येईल तसेच पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि अकोला येथेही पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मीरा-भाईंदर व वसई-विरार या परिसरात एकूण लोकसंख्या 39 लाख इतकी असून यात साडेसहा लाख कामगारांचा समावेश आहे. या परिसरात 46 संवेदनशील ठिकाणे आहेत. हे सर्व या संयुक्त पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येतील. वसई आणि विरार येथे उपविभागीय पोलीस कार्यालये असतील. वसई अंतर्गत सहा पोलीस ठाणी तर विरार अंतर्गत सात पोलीस ठाणी असतील.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य आनंद ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००
वाशिम येथील विद्यार्थीनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 2 : आमखेडा (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील कृषी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीच्या मृत्यूच्या चौकशीमध्ये कोणताही विलंब झाला नसून घटनेचे गांभीर्य पाहाता संवेदनशीलपणे अधिक चौकशी करुन कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सदर विद्यार्थीनीच्या वडीलांनी महाराष्ट्र व तेलंगना मुख्यमंत्र्यांना तक्रार सादर केली. या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००
वृ. वि. 6282 10 श्रावण, 1939 (दु. 4.25 वा.)
अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कोणाचीही बदनामी होणार नाही याची दक्षता घेणार
– विनोद तावडे
मुंबई, दि. 2 : शालेय अभ्यासक्रमात इतिहास शिकविताना त्यात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा समावेश करण्यात येतो. तथापि, या माध्यमातून कोणाचीही बदनामी होणार नाही,याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितले.
श्री. तावडे म्हणाले, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळाबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या सन २००० पर्यंतच्या ठळक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. या काळात विविध प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि घटनांचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळातील घटनांच्या उल्लेखाच्या अनुषंगाने बोफोर्स प्रकरणामुळे सरकार गेल्याचे म्हटले आहे. हा इतिहास सन २००० सालापर्यंतचाच असल्याने आणि राजीव गांधी यांच्या निर्दोषत्वावर त्यानंतर निर्णय झाल्याने त्याबाबत अभ्यासक्रमात उल्लेख आलेला नाही.
यास्तव अशा घटनांमुळे कोणाचीही बदनामी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
००००
-ब्रिजकिशोर झंवर
वृ. वि. 6275 10 श्रावण, 1939 (दु. 2.00 वा.)
राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका
मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 6नोव्हेंबर 2017 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक31 ऑगस्ट पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
57 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 6 नोव्हेंबर, 2017 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 15 व्या बालनाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी 4 डिसेंबर 2017 पासून एकूण पाच महसुली विभागात आयोजित करण्यात येणार आहे. हिंदी, संगीत आणि संस्कृत भाषेतील नाट्य स्पर्धा जानेवारी2018 मध्ये आयोजित करण्यात येतील.
बालनाट्य वगळता इतर नाट्य स्पर्धेसाठी रु.3 हजार तसेच बालनाट्य स्पर्धेसाठी रु.1हजार इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्याwww.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 31 ऑगस्ट, 2017 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.
1) मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य, जुने सचिवालय,विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
2) पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय,विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (020-20271301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
3) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्ड टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
4) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.
000
वर्षा फडके- आंधळे/विसंअ/ 2 ऑगस्ट 2017
वृ. वि. 6276 10 श्रावण, 1939 (दु. 2.00 वा.)
विधानसभा कामकाज :
राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत एका महिन्यात चौकशी करणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपा ध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत फॉरेन्सिक चौकशीसह एका महिन्यात संपूर्ण चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य अजित पवार यांनी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आणि मध्यस्थी यांच्यातील ऑडीओ क्लीपमधील संभाषण वाचून दाखविले. तसेच त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राधेश्याम मोपलवार यांच्यासंदर्भातील क्लीपमधील आवाजाबाबत फॉरेन्सिक चौकशी करून त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी बोलताना मोपलवार यांच्यावर कारवाईची मागणी केली.
०००
नांदेड जिल्ह्यातील डेंग्यू व हिवतापावर नियंत्रण आणण्यासाठी शासन प्रयत्नशील
– डॉ. दीपक सावंत
मुंबई, दि. 2 : नांदेड जिल्ह्यात डेंग्यू आणि हिवतापाचे रूग्ण आढळले असून, त्यासाठी प्लेटलेट्सची व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र, प्लेटलेट्स कमी पडल्यास त्यांचा पुरवठा केला जाईल. या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
नांदेड जिल्ह्यात डेंग्यू व हिवतापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्यासंदर्भात सदस्य अमिता चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. सर्वश्री सदस्य आशिष शेलार, डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. सुजीत मिणचेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.
डॉ. सावंत म्हणाले नांदेड जिल्ह्यात डेंग्यू चे 392 रूग्ण आढळले असून, त्यासाठी लागणा-या प्लेटलेट्स उपलब्ध करण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. हे प्लेटलेट्स जर कमी पडल्यास त्यांचा पुरवठाही केला जाणार आहे. हिवतापाचे 52 केसेस आढळले असून,संवेदनशिल भागात 3200 मच्छरदाण्यांचेही वाटप करण्यात आले आहे. कर्मचा-यांचा तुटवडा असून, फवारणी कर्मचा-यांना संबंधीत कारवाईसाठी आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर राज्यात पॅरामेडीकल स्टाफ येत्या तीन महिन्यात भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद जिल्हाधिकारी स्तरावर भरण्याचे आदेश दिले आहेत.
याचबरोबर डेंग्यू व हिवताप प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य कर्मचा-यांमार्फत नियमीत ताप सर्व्हेक्षण करण्यात येते. उद्रेकाच्या ठिकाणी जलद ताप रूग्ण सर्व्हेक्षण सुरू आहे. डेंगी रूग्णांना लक्षणाधारीत उपचार करण्यात येतो. सर्व आरोग्य संस्थांना औषधे व इतर साधन सामुग्रीचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिन, डेंग्यू प्रतिरोध महिना व शालेय डेंग्यू जागृती मोहीम तसेच जागतिक दिन व हिवताप प्रतिरोध महिना याद्वारे जनतेमध्ये जनजागृती करण्यात येते असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
००००
वृ. वि. 6277 10 श्रावण, 1939 (दु. 3.00 वा.)
भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे संबंधित विभागाच्या
आहरण संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठवली
मुंबई, दि. २ : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१६-१७ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे, प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी) I , महाराष्ट्र मुंबई कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्याकरिता राज्याच्या संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहेत. संबंधित वर्गणीदारांनी आपली भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन प्रधान महालेखाकार कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.
या वार्षिक विवरणपत्रात जर काही त्रूटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट किंवा डेबिट दर्शविले असेल तर त्याचे विवरण व ज्या वर्गणीदाराची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरणपत्रात नमुद केली नसेल तर त्याचा तपशील त्यांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे सादर करावा म्हणजे त्यात योग्य त्या सुधारणा करून देणे सोयीचे होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे ऑगस्ट२०१७ पासून इंटरनेटवर सुद्धा वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील. यासाठी संकेतस्थळाचा पत्ता http://agmaha.cag.gov.in असा आहे.
००००
वृ. वि. 6277 10 श्रावण, 1939 (दु. 3.00 वा.)
विधानसभा लक्षवेधी :
म्हारवंड व जिमनवाडी येथील रहिवाश्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येईल
– मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 2 : सातारा जिल्ह्यातील म्हारवंड व जिमनवाडी या दोन गावांच्या पुनर्वसनासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
श्री. पाटील पुढे म्हणाले, मदत व पुनर्वसनाच्या निकषाप्रमाणे ही अपवादात्मक स्थिती या दोन गावांमध्ये आहे. पाटण तालुक्यातील म्हारवंड व जिमनवाडी या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये अनुक्रमे एकूण 68 व 46 कुटुंब राहत आहेत. मौजे म्हारवंड येथील 28 कुटुंबांच्या तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरासाठी निवासी शेड बांधण्यासाठी 17 लाख 92 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. व आवश्यक ती तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संबंधीत जिल्ह्यातील प्रशासनाची बैठक एका आठवड्यात घेण्यात येईल व तात्पुरते पुनर्वसन 15 दिवसांत करण्यात येईल.
ही लक्ष्ावेधी सूचना सदस्य शंभूराज देसाई यांनी मांडली होती.
००००
वृ. वि. 6278 10 श्रावण, 1939 (दु. 3.20 वा.)
विधानसभा प्रश्नोत्तरे :
ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठीच्या विशेष अनुदानात वाढ करणार
– ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 : ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारत, दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली १० लाखाची तरतूद वाढविण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला असून, यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या अनुदानाबाबत सदस्य अमल महाडीक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य चंद्रदीप नरके, सुभाष साबणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
श्री. भुसे पुढे म्हणाले, ग्रामपंचायतींना जनसुविधा देण्यासाठीचे विशेष अनुदान हे नियोजन विभागाच्या माध्यमातूनच दिले जाते. हा निधी वाढविण्यासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. हे वाढीव अनुदान दफन आणि दहनभूमीसोबत ग्रामपंचायत कार्यालयासाठीही लागू आहे. महिला सक्षमीकरण अभियानासाठी ५००० गावांमध्ये इमारतींची आवश्यकता आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारती २५ वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्याचे प्रस्तावित आहे. ग्रामपंचायत संदर्भातील समस्या लवकरच सोडविण्यात येतील, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.
००००
वृ. वि. 6279 10 श्रावण, 1939 (दु. 4.00 वा.)
घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून धनादेशाचे वाटप
मुंबई, दि.2 : घाटकोपर येथील सिद्धी साई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते आज विधानभवन येथे करण्यात आले.
इमारत दुर्घटनेतील कुटुंबाच्या पुनर्वसनसाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांना यावेळी सांगितले.
उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार राम कदम, नगरसेवक निल सोमय्या, इमारतीतील रहिवासी आदी यावेळी उपस्थित होते.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





