पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन– नागरिकत्व दुरूस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात आज बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सांगली , भुसावळ आणि धुळे जिल्ह्यात या अंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. सांगली येथील रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड करण्यात आली होते. एवढेच नव्हेतर, सांगलीत जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आले. यामुळे अंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
यवतमाळ मध्ये चौकात दुकाने, दुचाकी यांची तोडफोड…
आंदोलकांनी यवतमाळमधील अग्रसेन चौकातील दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, दुकानदारांनी नकार दिल्याने संतप्त झालेले आंदोलक दुकानांमध्ये घुसले आणि सामानाची नासधूस करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी काही दुकानदारांनी आंदोलकांवर मिरची पावडर फेकण्यास सुरूवात केली. यामुळे आंदोलक आणखीनच भडकले आणि त्यांनी संपूर्ण चौकात दुकाने, दुचाकी यांची तोडफोड सुरू केली.
सांगलीत आंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. सांगलीत गेल्या वर्षी महापूर आला होता. तसेच महापूरातून सावरत असताना बंद कशासाठी असा प्रश्न व्यापाऱ्यांनी विचारला. परंतु, जबरदस्तीने दुकाने बंद करत असल्याने अंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.




