पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शालेय शिक्षणाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता नववी ते ११ वी ची परीक्षा एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनो व्हायरसचा प्रसार होत असल्यानं राज्यातील परिस्थिती संवेदनशील होत चालली आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरात नागरिक बाहेर जाण्याचं टाळत आहे. राज्य सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, प्रवास टाळावा, तसेच स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे.
गेल्या आठवड्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढल्यानं सरकारनं शाळा महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर लोकांची गर्दी होणारी ठिकाणही बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे शालेय परीक्षा कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यासंदर्भात अखेर सरकारनं निर्णय घेतला आहे.
Posted inPandharpur Live News

