Pandharpur Live Online- मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे सर्वत्र अपरिहार्य अशी लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रूग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून खासगी दवाखाने आणि ओपीडी सुरू ठेवावी, असे आवाहन आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस वारंवार करत आहेत. तसेच या रूग्णांना शक्यतोपरी मदतीचे आवाहनही केले जातेय.
खा. सुप्रिया सुळे यांनी यवतमाळ मधील वरुड येथील दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेच्या मदतीला धावून जात याबाबत एक आदर्श उदाहरण समोर ठेवला आहे. लॉकडाऊनमुळे या बालिकेला अत्यावश्यक औषधं मिळणं कठीण होऊन बसलं होतं. याची माहिती समजताच खा. सुप्रियाताई सुळे यांनी तात्काळ पाठपुरावा करत थेट दिल्लीवरून तिला अत्यावश्यक औषधे मिळवून दिली.
या बालिकेवर मुंबईच्या एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. मात्र अचानक लॉकडाऊन लागू झाल्याने बालिकेला लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांची गरज भासली. जीवन-मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीसाठी वडिलांनी जगभरातून औषधांसाठी पाठपुरावा केला. परंतु कुठेचं मार्ग सापडत नव्हता. हताश झालेल्या वडिलांनी खा. सुप्रियाताई सुळे यांना संपर्क साधला. सुप्रिया सुळे यांनी तडक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने देशभरातील औषध वितरकांची माहिती घेतली.
दिल्लीमध्ये आवश्यक औषध उपलब्ध असल्याचे समजताच तडक संपर्क केलाच शिवाय औषधे अत्यंक स्वस्त दरात उपलब्ध करून दिली. तसेच राज्यात ल़ॉकडाऊन असल्याने विशेष परवानगी घेऊन औषधे थेट मुलीच्या घरी पोहोचवण्यात आली. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून घरपोच औषधे मिळालेली पाहून या बालिकेच्या वडिलांचे डोळे पाणावले. खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या या मदतीद्वारे एक नवा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे.

