Pandharpur Live Online – राज्यात आज 771 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज गेल्या काही दिवसातील राज्यातील मनपा आणि जिल्ह्याची आयसीएमआर यादीनुसार अद्ययावत आकडेवारी ही जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजार 541 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 310 झाली असून, मुंबई महापालिका हद्दीतील मृतांचा एकूण आकडा 361 इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आज 350 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत राज्यात 2465 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशात करोना बाधितांची संख्या आता 42 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथे काल 27 नवीन कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने मालेगावमधल्या एकूण रुग्णांची संख्या 324 झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 360 झाली असून, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये नवे 7 कोरोनाग्रस्त आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 52 झाली आहे. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झालेला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सोलापुरात काम करत असताना त्याला ही लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांची चाचणी करण्यात आली मात्र त्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतून चालत आलेला एक रुग्ण मंडणगड तालुक्यातल्या तिडे गावचा रहिवासी आहे. संगमेश्वर तालुक्यातली एक महिलाही करोनाग्रस्त आढळून आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चार रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या दहा इतकी झाली आहे. सांगली जिल्ह्यात आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळला आहे. कर्नाळ गावातला हा 35 वर्षीय रुग्ण सातारला गेला असता मुंबईहून आलेल्या नातलगाला भेटला होता. सध्यस्थितीत सांगली जिल्ह्यात एकूण सात करोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 34 झाली आहे.
उत्तरप्रदेशमध्य एका ट्रक चालकाला 2 मे रोजी वाशीम इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या ट्रक चालकाचा काल मृत्यू झाला. त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुकसा फाटा इथल्या ज्या पेट्रोल पम्पावर या चालकाने पेट्रोल भरले होते, तो पेट्रोलपंप खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आला आहे. तसेच या ट्रकचालकाच्या सहकार्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
आज 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृ्त्यूंपैकी मुंबई मधील 18, पुण्यातील 7, अकोला मनपातील 5, सोलापूर जिल्हातील 1, औरंगाबाद शहरात 1, ठाणे शहरात 1 आणि नांदेड शहरात 1 मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 583 झाली आहे.
आज झालेल्य मृत्यूंपैकी 22 पुरुष तर 13 महिला आहेत. आज झालेल्या 35 मृत्यूंपैकी 60 वर्ष किंवा त्यावरील 13 रुग्ण आहेत, तर 19 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षाखालील आहेत. मृत रुग्णापैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती मिळालेली आहे. उर्वरित 33 जणांपैकी 23 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 76 हजार 323 नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार 349 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले असून, 14 हजार 541 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यत राज्यातून 2 हजार 465 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात 1 लाख 98 हजार 42 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून, 13,006 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत असे राजेस टोपे म्हणाले.
देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती….
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून आज 42 हजार 533 वर पोहोचली आहे. यापैकी 29 हजार 453 अॅक्टिव्ह केसेस आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 11000 पेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. एकूण 11707 रूग्ण बरे झाले आहेत आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 27.52 टक्के आहे.

