👁 10 Views

मोठी बातमी: सोलापूर जिल्ह्यातील वाळु तस्करीला लागणार ब्रेक! चारच दिवसात वाळु उपशाला मिळणार परवानगी !!

संग्रहित छायाचित्र 

Pandharpur Live Online: गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यामधील रखडलेल्या वाळू उपसा ठेकेदारीच्या लिलावाला अखेर शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार लवकरच जिल्ह्यातील 9 ठिकाणच्या वाळू लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरम्यान, या लिलाव प्रक्रियेमुळे वाळू उपशालाही अधिकृत परवानगी मिळणार आहे. दुसरीकडे शासनाला महसुलाचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या चार दिवसांत वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू सहज उपलब्ध होऊन वाळू तस्करीलाही ब्रेक लागणार आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील वाळू उपशासाठीच्या ठेकेदारीची लिलाव प्रक्रिया बंद होती. परंतु चोरून वाळु उपसा व विक्री चालुच होती. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या महसुलावरही झाला होता. 

वाळू लिलाव बंद असल्याने शासनाला प्रतिवर्षी मिळणारा 40 ते 50 कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता. दुसरीकडे वाळूअभावी अनेक शासकीय, निमशासकीय कामांसह गोरगरिबांच्या घरकुलांचीही कामे रखडली होती. अशा स्थितीत वाळू तस्करीचे प्रमाण वाढले होते. वाळू उपसा बंद असतानाही तस्करांनी खुलेआम बेमाफ वाळू उपसा सुरू ठेवला होता. चोरून विक्री होत असलेल्या वाळूचे भाव गगनाला भिडले होते. अशा वाळू तस्करीवर प्रशासनाने कारवाईचा बडगाही उगारला होता. त्याअंतर्गत लाखो रुपयांची तस्करी पकडून कारवायाही करण्यात आल्या. अनेक ठिकाणी तहसीलदार, प्रांतांच्या अंगावर गाड्या घालण्याचे प्रकारही झाले होते.

वाळूचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी बांधकामे थांबविली होती. यातून बांधकामाचे दर वाढल्याने घरांच्या किंमतीही प्रचंड वाढल्या होत्या. मात्र शासनाला मोठ्या महसुलाला मुकावे लागले होते. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील वाळू ठेक्यांचा समावेश आहे. त्यानुसार येत्या चार दिवसांत वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू सहज उपलब्ध होऊन वाळू तस्करीलाही ब्रेक लागणार आहे.

पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व  दक्षिण सोलापूर या तालुक्यात वाळू  लिलाव होणार होता. परंतु दक्षिण सोलापूर व पंढरपूर मधून प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत. कारण या ठिकाणी नदीपात्रात पाणी असल्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मोहोळ व मंगळवेढा या तालुक्यातील 9 ठिकाणी वाळू लिलाव होणार आहेत. त्याबाबतची ई टेंडर प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे. दिनांक 21 मे  पर्यंत या टेंडरची शेवटची मुदत राहणार असून 24 मे ला  टेंडरची बोली लागणार आहे व याच दिवशी दुपारी 3  वाजेनंतर टेंडर ओपन होणार असल्याचे सांगितले जात आहे. 9 ठिकाणचे एकूण 60 कोटी रुपये पर्यंतचे टेंडर असून एका घाटाची किंमत किमान 6 कोटी च्या आसपास कमी जास्त राहणार आहे.

 मंगळवेढ्यातील अर्धनारी, बठाण, मिरी सिद्धापूर,तामदरडी, आदी गावांचा समावेश या टेंडरमध्ये होणार आहे.

 शासनाच्या पर्यावरण समितीकडून 30 सप्टेंबर पर्यंत उत्खनन करण्याचे वेळ मिळाली आहे.मात्र  10 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत शासन जीआर प्रमाणे उत्खनन बंद ठेवावे लागणार आहे.



 उशिरा का होईना सोलापूर जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये याचे स्वागत केले जात आहे. या मुळे नक्कीच वाळूचे दर थोडे फार कमी होतील व रखडलेल्या बांधकामांनाही जोमाने सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून इतरही तालुक्यात  पाणी कमी झाल्यानंतर लवकरात लवकर वाळू उपस्याचे टेंडर काढावे अशी मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *