Pandharpur Live Online: राज्यात दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर आता प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. त्यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आज राज्यातील कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणूनच आता येतं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती.

त्यानुसार आता येत्या 1 नोव्हेंबरपशुयन राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं त्यासंबंधीची माहिती दिली जाईल” असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.

त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत. कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय जरी घेण्यात आलं असला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण झालं असणं महत्त्वाचं आहे. कोरोणचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांचं किती टक्के लसीकरण झालंय हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.

