बारामती – नात्यातील एका मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन येथील एका युवकावर दुस-या युवकाने कोयत्याने वार केल्याची घटना बारामतीत घडली.
या संदर्भात सिध्दार्थ सुनील चौधर (वय 19, रा.वंजारवाडी, ता. बारामती) याने फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी नागेश ज्ञानदेव गोफणे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी (ता. 17) संध्याकाळी नात्यातील एका मुलीसोबत नागेश गोफणे एका कॅफेमध्ये बसला होता, ही घटना पाहिल्यानंतर त्याचा जाब सिध्दार्थ याने नागेशला विचारल्याचा राग मनात धरुन नागेश याने सिध्दार्थ याच्यावर कोयत्याने मानेवर, पाठीत व मांडीवर वार केले. डोक्यात कोयता मारत असताना तो वार हातावर घेतल्याने हाताला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी नागेश गोफणे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कोयत्याने मारहाण होण्याची गेल्या काही दिवसातील ही तिसरी घटना आहे. पोलिस नेमके काय करत आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गोपनीय नावाचा विभाग काय करतो, गावात सुरु असलेल्या घडामोडींची माहिती पोलिसांना का मिळत नाही, एखाद्याचा जीव जाईपर्यंत वाट बघीतली जाणार का, अशी लोकात चर्चा आहे.
बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्यात घडणा-या घडामोडींची माहिती माध्यमांपासून दडवून ठेवली जाते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी अनेकदा सूचना देऊन दोन्ही पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांनाही जुमानतच नाही असेच चित्र वारंवार समोर येते. पोलिसांचा बारामतीत वचकच राहिलेला नाही, गुन्ह्यांचा तपास होत नाही, माहिती लोकांपर्यंत जाऊच दिली जात नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एफआयआर दाखल झाल्यानंतर काही अपवाद वगळता इतर सर्व एफआयआर चोवीस तासात लोकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मनाला येईल तेव्हा हे काम केले जाते. वरिष्ठ अधिकारीही या कडे कानाडोळा करतात, अनेक एफआयआर टाकल्या जातात की नाही हाही एक संशोधनाचाच विषय आहे. एकीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष व दुसरीकडे प्रभारी अधिकारी वरिष्ठांना जुमानत नसल्याने बारामतीत पोलिस दलात फेरबदलाची नागरिकांची मागणी होत आहे.


