लातूरमधून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावी आणि अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत आढळून आलेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरानजीक असलेल्या वसवाडी परिसरात १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. ती इयत्ता १० वीमध्ये लातुरमधील एका शाळेत शिक्षण घेत होती. तर मृत मुलगा मूळचा केज तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
मुलगी १५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शाळेला जाते असं सांगून घराबाहेर पडली. रोज दुपारी १ वाजता ती घरी येत असे. मात्र १५ तारखेला ती घराकडे परतलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी तिला सर्वत्र शोधलं. मात्र ती कुठेही सापडली नाही.
कुटुंबियांची चिंता वाढू लागली त्यामुळे त्यांनी,याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. शुक्रवारी दुपारी ४च्या सुमारास चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याने गावात एकच चर्चा सुरू झाली.
शिवाय, विहिरीच्या काठावर मुलाची चप्पल मिळाली. पोलिसांनी संशय व्यक्त करत विहिरीत मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र शुक्रवारी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे शनिवार सकाळपासूनच पुन्हा शोध मोहीम सुरू केली. अखेर सायंकाळी ५ वाजता मुलाचाही मृतदेह पोलिसांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. असे गातेगाव ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोर कांबळे म्हणाले.
नुकताच व्हेलेंटाइन डे सर्वत्र साजरा झाला. त्यानंतर ५ दिवसांनी गावात ही घटना घडली आहे. या घटनेनं गावकरी चिंतेत आहेत. तसेच मुलगा आणि मुलीच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला आहे.



