गोव्यात एक स्थिर सरकार – नितीन गडकरी
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – गोवा राज्यामध्ये विधान सभेत सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. 23 लोकांचे समर्थन आम्हाला मिळाल्याने भाजपाचे बहुमत सिद्ध झाले आहे. मनोहर पर्रिकर आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील, असे केंद्रीय मंत्री तथा गोव्याचे निरीक्षक नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जी काँग्रेस पार्टी स्वतःचा नेता ठरवू शकत नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. काँग्रेसने संधी गमावली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनामध्ये दुफळी होती. त्यामुळे त्यांनी संधी गमावली. ज्यांनी आमच्या आधीही असे प्रयोग अनेकदा केले आहेत त्या काँग्रेसने आम्हाला ज्ञान शिकवू नये, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात संरक्षण मंत्री पदाची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र ही चर्चा निरर्थक असल्याचा खुलासा करीत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. असे गडकरी यांनी सांगितले. गोव्यात काहीही लोकशाहीच्या विरोधात झालेले नाही. आम्ही आधी सरकार स्थापनेचा दावा केला होता. आम्हीही विरोधी पक्षात होतो. निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप आम्हीही त्यावेळी केला होता. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. पराभव झाल्यानंतर विरोधक असे आरोप करत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
