एका महिलेने लावला भय्यूजी महाराजांवर फसवणुकीचा आरोप..
1 May. 2017
आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज विवाहबंधनात अडकल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. लग्नाच्या दिवशीच त्यांच्यावर एका महिलेने काही गंभीर आरोप केले आहेत. भय्यू महाराज हे अत्यंत भोंदू महाराज असून, त्यांनी फसवणूक केल्याचा दावा करणारी पोस्ट या महिलेने केली आहे. मल्लिका राजपूत असे या महिलेचे नाव असून ती भाजपची कार्यकर्ती असल्याचे समजते.
मल्लिका राजपूत यांची केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘’भय्यूजी महाराज यांनी माझ्याकडून चरित्र लेखन करुन घेतलं. कित्येक महिने मी अभ्यास करुन ते पुस्तक पूर्ण केले. या पुस्तकाच्या ९५० प्रती दोन ते अडीच वर्षांपासून भय्यू महाराजांकडे आहेत. त्या प्रती ते मला परतही देत नाहीत आणि प्रकाशितही करत नाहीत. मला फसवून आता वेगवेगळ्या नंबरवरुन माझ्याशी बोलत आहेत. भय्यूजी महराजांवर कुणीही विश्वास ठेवू नका. पुस्तकासाठी भय्यू महाराजांना मी कोर्टाची नोटीस पाठवणार आहे.’’, असे मल्लिका यांनी म्हटले आहे.

