मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वळीवाने झोडपले. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोल्हापूर शहरासह आजरा, कागल, करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड मलकापूर या तालुक्यात सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. सांगली शहरासह वाळवा, शिराळा आणि खानापूर तालुक्यांनाही पावसाने जोरदार तडाखा दिला. तर शिराळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. खानापूर पूर्वभागातही मध्यरात्री गारा पडल्या. सातारा जिल्ह्यातील फलटण, शिरवळ, पाटण, औंध, कोरेगाव व मेढा परिसरातही जोरदार पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यात करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोल्यासह अक्कलकोट तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह दुपारी जोरदार पाऊस झाला.


