👁 11 Views

भारतातही समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे- सोनू निगम

काही दिवसांपासून अजानच्या मुद्द्यावरुन गायक सोनू निगम चर्चेत होता. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुन. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगमने देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे. देशात समान कायदा लागू होण्याची मागणीही त्याने या मुलाखतीदरम्यान केली.
‘भारतात बऱ्याच जाती-धर्माचे लोक राहत असल्यामुळे या देशाला वेगवेगळ्या कायद्यांच्या आधारे चालवता येणार नाही’, असं मतही त्याने या मुलाखतीदरम्यान मांडलं. यावेळी अजानच्या मुद्द्यावरुनही सोनूला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, ‘काही लोक धर्माला देशापेक्षा जास्त महत्त्व देतात. मी मंदिर, मशीद आणि गुरुद्वाऱ्यांवर लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरच्या विरोधात नाही. पण, त्यामुळे जर इतरांना त्रास होत असेल तर मात्र कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे.’ देशातील कायदेव्यवस्था आणखी कठोर केली तर अशा बऱ्याच चालिरितींना आळा घालणं सहज शक्य आहे, असं वक्तव्यही सोनूने या मुलाखतीत केलं. यावेळी सोनूने त्याला धमकावणाऱ्या मौलवींविरोधात कोणतीही कारवाई न केली गेल्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याच्या मते, प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणं ही सरकारची जबाबदारी आहे.
सोनू तर दमदार बंदा – अनुपम खेर
‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत सोनूने बऱ्याच विषयांवर त्याचं मत मांडलं. भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या अस्वस्थ वातावरणाविषयीही सोनूने वक्तव्य केलं. यावेळी या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याची बाब त्याने नाकारली. सोशल मीडियावर ‘चला युद्ध करु..’ असं म्हणणं सोपं आहे. पण, या युद्धामध्ये एक संपूर्ण पिढी नष्ट होऊ शकते. त्यामुळे ही लहान गोष्ट नसून, याविषयी दोन्ही देशांनी गहन विचार करण्याची आवश्यकता आहे. असं मत मांडत सोनूने पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यावर लावण्यात आलेल्या बंदीचाही विरोध केला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *