ईव्हीएम मुद्द्यावरून विरोधकांना टोला
भाजप अध्यक्ष अमित शहा
देशाचे पुढील राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच (NDA) होतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीरमधील परिस्थिती, ईव्हीएम, नोटाबंदी आणि अन्य मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले.
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांवरून अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी (विरोधक) निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएम योग्य होते. पण आम्ही निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांचे हे आरोप जनता मान्य करणार नाही. आता जातीवाद आणि धर्माचे नव्हे तर विकासकामांचे राजकारण चालते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. जातीवाद आणि धर्माच्या राजकारणाऐवजी विकासकामे हाच निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे, असेही ते म्हणाले.
विकासकामांच्या राजकारणामुळे गुजरात मॉडेलच्या आधारावर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले. अनेक राज्यांतही भाजपची सत्ता आली. ज्या ठिकाणी निवडणुकांमध्ये पराभूत झालो, तेथे मतांच्या टक्केवारीत घट झालेली नाही. ओडिशा, बंगाल, केरळ, त्रिपुरा या राज्यांत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत आश्चर्यकारक वाढ झाली आहे. त्यामुळे राजकीय पंडितही अवाक् झाले आहेत, असेही अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्न आणि नक्षलवाद या विषयांवरही भाष्य केले. हे दोन्ही गंभीर प्रश्न असून, ते सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लष्कर या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे. नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवा, काश्मीरमध्ये शांतता नांदेल, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




