Pandharpur Live Online –
एलआयसीनंतर सरकारकडे विकण्यासारखं काहीही उरणार नाही.त्यानंतर हे सरकार काय करणार?, असं म्हणत LIC बचावचा नारा राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सरकारच्या हातात शिल्लक राहिलेलं शेवटचं रत्न अर्थात LIC. तीच विकून त्यातून काही निधी उभारण्याचा घाट या सरकारने घातलाय.
केंद्रिय मंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. रोजगार निर्मिती, मंदी या सगळ्याचं सावट आजच्या अर्थसंकल्पावर होतं. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. एलआयसीमधील भागीदारी विकण्याचा सरकारचा विचार असल्याचं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं आहे. त्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
एलआयसीनंतर सरकारकडे विकण्यासारखं काहीही उरणार नाही.त्यानंतर हे सरकार काय करणार?, असं म्हणत त्यांनी LIC बचावचा नारा दिला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्प सादर करीत असताना शेअरबाजार तब्बल 700 अंकांनी कोसळला. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत वर्षातील सर्वात मोठे भाष्य संसदेत होत असताना बाजार कोसळला यावरुन या अर्थसंकल्पात काहीच अर्थ नाही हे उघड आहे, अशा शब्दात त्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा समाचार घेतला.
दुसरीकडे राज्यातील भाजप नेत्यांनी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. दशकातील हा सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय.


