👁 8 Views

विशेष लेख: अवघ्या पाच दिवसांत बांधून पूर्ण झालेला रामसेतू : वानरसेनेच्या श्रीराम भक्तीचा साक्षीदार ; ‘मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण

 
 

‘मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण. अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावे लागले. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, असे असले तरी मानवी जीवनातील सर्व भोग श्रीरामांना भोगावे लागले. रावणाने सीताहरण केल्यानंतर सुग्रीवाच्या मदतीने सर्व वानरांना एकत्रित करून श्रीरामांनी रावणदहन केले. रामभक्त हनुमान, सुग्रीव, अंगद हे सर्व मानव होते. मात्र, त्यांची युद्धपद्धती वानरांसारखी असल्यामुळे त्यांना वानर म्हणून संबोधले जायचे. दक्षिण तीरी आल्यावर समुद्र उल्लंघावा कसा, असा प्रश्न सर्वांसमोर पडला. त्यावेळी श्रीरामांनी समुद्राचे आवाहन केले. तीन दिवस आवाहन करूनही समुद्र प्रकटले नाहीत, तेव्हा श्रीरामांनीच समुद्रावर शस्त्र उगारले. तेव्हा रामबाणाच्या भयाने समुद्र तत्क्षणी प्रकट झाले. समुद्रावर सेतू बांधण्याचा सल्ला समुद्र देवाने श्रीरामांना दिला. यानंतर सर्व वानरांनी मिळून नल आणि नील यांच्या नेतृत्वाखाली सेतू निर्माणाचे कार्य सुरू केले. रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नारपर्यंत हा सेतू उभारण्यात आला. रामेश्वर येथे समुद्राची पातळी कमी असल्यामुळे त्या ठिकाणाहून सेतू निर्मिती करण्यात आली, असे सांगितले जाते. जाणून घेऊया रामसेतूबाबतच्या रंजक गोष्टी…

वानरांच्या सेनेत नल आणि नील हे दोघे श्रेष्ठ वानर होते. ते प्रत्यक्षात विश्वकर्मा यांचे पुत्र होते. निर्माणाचे तंत्रज्ञान, त्यातील बारकावे, उत्तम पद्धती याचे त्यांना चांगले ज्ञाान होते. त्यामुळे या दोघांच्या हातून सेतू निर्माण केला जावा, अशी सल्ला समुद्र देवाने श्रीरामांना दिला होता. त्यानुसार सेतू उभारण्यास सुरुवात झाली. संपूर्ण वानरसेनेला हाताशी घेऊन सेतू उभारण्यास सुरुवात झाली. सेतू निर्माण करताना त्यात वापरण्यात येणाऱ्या गोष्टींवर श्रीराम/राम लिहिले जात असे. रामनामाच्या वस्तू समुद्रावर तरंगायच्या. दगड, मोठे वृक्ष यांच्या मदतीने सेतूचे काम पूर्ण झाले.

नल आणि नील दोघेही लहानपणी खूप मस्ती करायचे. उपासनेसाठी बसलेल्या ऋषींच्या वस्तू ते समुद्रात फेकून द्यायचे. ऐनवेळी वस्तू न सापडल्यामुळे ऋषिमुनींना समस्या उत्पन्न होत असे. असेच एकदा वस्तू समुद्रात फेकून दिल्यामुळे एका ऋषिंनी त्यांना शाप दिला. या शापानुसार, त्यांनी समुद्रात फेकलेल्या वस्तू बुडणार नाहीत. रामकार्य करताना हा शाप मोठे वरदान ठरला. नल आणि नील यांनी टाकलेल्या वस्तू न बुडाल्यामुळे सेतू निर्माणात त्याचा लाभ झाला.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही कित्येक महिन्यांनंतर एखादे काम पूर्ण झालेले आपणास दिसते. मात्र, नल आणि नील यांच्या नेतृत्वाखालील सेतू अवघ्या पाच दिवसांत बांधून पूर्ण झाला. या सेतूची लांबी १०० योजन एवढी आहे. योजन हे अंतर मोजण्याचे तत्कालीन प्रमाण आहे. एक योजन म्हणजे सुमारे १३ ते १४ किलोमीटर होय. वानरांचे परिश्रम आणि रामांच्या ईश्वरी शक्तीच्या मदतीमुळे हे काम अवघ्या पाच दिवसांत पूर्ण झाले, अशी मान्यता आहे.

रामेश्वरम ते श्रीलंकेपर्यंत रामसेतू बांधण्यात आला. या सेतूसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांवर रामनाम लिहिले जायचे. हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईनेही सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. सर्व जण कठोर मेहनत घेताहेत, हे पाहून रामालाही राहावले नाही. त्यानेही एक दगड घेतला आणि समुद्रात टाकला. मात्र, तो दगड बुडाला. ही गोष्ट वारंवार घडली. तेव्हा हनुमंत रामांजवळ आले आणि ते म्हणाले की, भगवंत, जो रामनामाशी एकरूप झाला, तो तरला. परंतु, खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचे बुडणे निश्चित आहे. हनुमंतांचे चपखल तत्त्वज्ञान ऐकून श्रीराम प्रसन्न झाले.

रामेश्वरम ते श्रीलंकेपर्यंत रामसेतू बांधण्यात आला. या सेतूसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांवर रामनाम लिहिले जायचे. हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईनेही सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. सर्व जण कठोर मेहनत घेताहेत, हे पाहून रामालाही राहावले नाही. त्यानेही एक दगड घेतला आणि समुद्रात टाकला. मात्र, तो दगड बुडाला. ही गोष्ट वारंवार घडली. तेव्हा हनुमंत रामांजवळ आले आणि ते म्हणाले की, भगवंत, जो रामनामाशी एकरूप झाला, तो तरला. परंतु, खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचे बुडणे निश्चित आहे. हनुमंतांचे चपखल तत्त्वज्ञान ऐकून श्रीराम प्रसन्न झाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *